ऑनलाईन टीम / मुंबई :
सत्ता गेल्यामुळे देवेंद्र फडणवीस (devendra fadanvis) वैफल्यग्रस्त झाले आहेत. त्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. ते पुढील 25 वर्ष वैफल्यग्रस्तच राहतील, अशी बोचरी टीका शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.
मुंबईत एका पत्रकार परिषदेत राऊत बोलत होते. ते म्हणाले, काल रात्री राणा दाम्पत्याला भेटून खार पोलीस स्टेशनबाहेर आल्यानंतर किरीट सोमय्या यांच्यावर हल्ला झाला. त्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस सरकारच्या दबावाखाली काम करत असून, लोकशाही पायदळी तुडवली जात असल्याचा आरोप केला होता. फडणवीस यांना महाराष्ट्रातील कायदा-सुव्यवस्थेबाबत काही प्रश्न वाटत असतील तर त्यांनी मुख्यमंत्र्यांना किंवा गृहमंत्र्यांशी चर्चा करायला पाहिजे. ही महाराष्ट्राची परंपरा राहिली आहे. मुख्यमंत्र्यांसमोर विरोधी पक्ष आपले म्हणणे मांडतो, मुख्यमंत्री ते ऐकतात. त्यानंतर तुम्हाला राष्ट्रपती, संयुक्त राष्ट्र किंवा आंतरराष्ट्रीय सुरक्षा परिषदेत जिथे कुठे जायचे असेल तिथे जावे.
पण भाजपचे लोक काही झाले तरी दिल्लीत जातात. तिथे केंद्रीय गृहसचिव किंवा गृहमंत्र्यांची भेट घेतात. हा काय तमाशा लावला आहे? महाराष्ट्रात पूर्ण बहुमताने निवडून आलेले सरकार आहे. ही गोष्ट भाजपला समजत नाही का? ही कोणत्या प्रकारची लोकशाही झाली, असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला.