ऑनलाईन टीम/तरुण भारत
मुंबई : विरोधकांचे तोंड गटार आहे. पण, अशाप्रकारे तुमच्या तोंडातून जर भिजलेले फटाके फुटणार असतील तर त्याची पर्वा आम्ही करत नाही, असा इशारा शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षांना दिला. औरंगाबाद येथे शिवसेनेची पहिली शाखा स्थापन झाली आहे. या शाखेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेनेची भव्य सभा आज आहे. या सभेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. या सभेच्या पार्श्वभूमीवर राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विरोधकांवर निशाणा साधला. (CM Uddhav Thackeray Rally at Aurangabad)
यावेळी बोलताना ते म्हणाले, शिवसेना पक्षप्रमुख यांच्याबद्दल विरोधकांचा व्यक्तिगत द्वेष असू शकतो. परंतु, राज्याचे मुख्यमंत्री यांच्याबद्दल काय बोलावे, कसं बोलावे याच भान त्यांनी ठेवले पाहिजे असे खडेबोल त्यांनी सुनावले. खरंतर मुख्यमंत्र्यांच्या कामाचा यांना खूप द्वेष आहे असेही ते म्हणाले.
राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांचे सरकार सत्तेत येत असताना कॉमन मिनिमम प्रोग्रॅम ठरविण्यात आला होता. ज्यात राज्याच्या विकासाचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यानुसार राज्याच्या कारभार होत असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान आजच्या सभेत मुख्यमंत्री काय बोलतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. आजच्या सभेत ठाकरी तोफ कोणावर धडाडणार. या तोफेच्या निशाण्यावर कोण असणार? सभेतून शिवसैनिकांना कोणता संदेश दिला जाणार याबाबत उत्सुकता आहे.