ऑनलाईन टीम / मुंबई :
केंद्र सरकारने ईडीच्या कारवाईपासून अभय दिल्यामुळेच राज ठाकरे (Raj thackeray) आता भाजपचा भोंगा वाजवत आहेत, अशी जळजळीत टीका शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केली आहे.
मुंबईत एका आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. राऊत म्हणाले, भाजपने राज ठाकरेंना ईडी कारवाईची धमकी दिली होती. आता ईडी कारवाईपासून केंद्र सरकारने अभय दिल्यामुळे राज ठाकरे भाजपचा भोंगा वाजवत आहेत. भाजप आमच्याशी थेट लढू शकत नाही. त्यामुळे आता असे भोंगे लावून माहौल तयार केला जात आहे. आम्ही ईडीच्या कारवाईला सामोरे जातोय, त्यांच्याशी लढतोय. त्यामुळे आम्हाला चिंतेचे कारण वाटत नाही.
राज ठाकरे यांनी मशिदींवरील भोंगे हटवण्यासंदर्भात राज्य सरकारला अल्टीमेटम दिला आहे. राज्य सरकारला अल्टिमेटम कोणीही देऊ शकत नाही. अल्टिमेटम देण्याची ताकद फक्त बाळासाहेब ठाकरे यांच्यात होती. बाळासाहेब ठाकरे यांनी या देशातील दहशतवाद्यांना दिला होता. राज ठाकरे यांचा जो अल्टिमेटम आहे, तो भाजपचा भोंगा आहे, असेही राऊत म्हणाले.