ऑनलाईन टीम / तरुण भारत :
शिवसेना नेत्या दिपाली सय्यद यांच्या ट्विटनंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्र येणार असल्याच्या चर्चा राजकीय वर्तुळात रंगल्या आहेत. त्यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
राऊत म्हणाले, मी पक्षाचा छोटा कार्यकर्ता आहे. मला त्याबद्दल माहिती नाही. पण दिपाली सय्यद अभिनेत्री आहेत. पक्षाचे काम करतात. अशा प्रकारची वक्तव्यं खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. दोन्ही नेते एकत्र येतील का हे येणारा काळ ठरवेल. ते आमचेच सहकारी आणि मित्र आहेत. इतकी वर्ष आम्ही काम केलेलं आहे. त्यामुळे त्यांना एकत्र यावं असं का वाटणार नाही.
यावेळी राऊत यांनी सरकारवरही निशाणा साधला. हे सरकार नैतिकतेच्या पायावर उभा आहे का? हे सरकार घटनेनुसार शपथ घेऊ शकतं का? तसं असेल तर मंत्रिमंडळ विस्तार का होऊ शकला नाही? त्याचं उत्तर महाराष्ट्राला मिळायला हवं. 40 आमदारांपैकी अनेक आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. यांच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. अशा वेळेला शपथ घेतल्यास सरकार कोसळेल, हे त्यांनाही माहिती आहे. त्यामुळे गेल्या पंधरा दिवसापासून महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळाची कॅबिनेट दोघांमध्ये होत आहे.
हेही वाचा : ठाकरे-शिंदे एकत्र येणार?; दिपाली सय्यद यांच्या ट्विटने चर्चांना उधाण