ऑनलाईन टीम / मुंबई :
राणा दाम्पत्याला खार पोलिसांनी केलेली अटक, तसेच या दाम्पत्याला भेटायला गेलेले भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांच्या गाडीवर झालेला हल्ला (car attack) यावरुन भाजप आक्रमक झाली आहे. यासंदर्भात भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत असतानाच शिवसेना खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी आज सकाळी नवं ट्विट करुन सोमय्या आणि राणा दाम्पत्यावर निशाणा साधला आहे. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतकी तळमळ मळमळ करण्याचे कारण काय?, असा सवाल राऊत त्यांनी ट्विटद्वारे केला आहे.
राऊत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “INS विक्रांत निधीचा अपहार करणारा आरोपी हा बोगस जात प्रमाणपत्र वापरून निवडून आलेल्या दुसऱ्या आरोपीला भेटायला जातो. लोकांच्या भावना तीव्र होतात आणि असे प्रकार घडतात. देशाशी बेइमानी करणाऱ्या चोरांवर दोन दगड पडले तर भाजपला इतकी तळमळ मळमळ करण्याचे कारण काय? आयएनएस विक्रांत घोटाळा देशद्रोह आहे. जय महाराष्ट्र…!” असे म्हणत त्यांनी किरीट सोमय्या आणि राणा दाम्पत्यावर टीकास्त्र सोडले आहे.
शनिवारी राणा दाम्पत्याने पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यांचे कारण पुढे करत मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा पठण करण्याचा निर्णय मागे घेतला. त्यानंतर मुंबई पोलिसांनी या दोघांना अटक केली होती. दरम्यान, रात्री राणा दाम्पत्याला भेटण्यासाठी खार पोलीस ठाण्यात गेलेल्या किरीट सोमय्या यांच्या गाडीवर शिवसैनिकांनी हल्ला केला होता. सोमय्या पोलीस ठाण्यातून बाहेर पडत असताना शिवसैनिकांनी त्यांच्या गाडीवर पाण्याची बाटली, चप्पल आणि दगडफेक केली. यामध्ये गाडीची काच फुटून किरीट सोमय्या यांना किरकोळ जखम झाली होती. या घटनेनंतर भाजप आणि शिवसेनेतील संघर्ष आणखी पेटला असून, भाजप नेत्यांकडून संतप्त प्रतिक्रिया येत आहेत. शिवसेना नेतेही त्याला प्रत्युत्तर देत आहेत.