पुणे : राजकारणात चढ-उतार हे येतच असतात. ते पचवता आले पाहिजेत, असा सल्ला शिवसेना नेते संजय राऊत यांनी संभाजीराजे छत्रपती यांना दिला.
संभाजीराजे छत्रपती यांनी राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून अपक्ष लढायची तयारी केली होती. मात्र, कोणत्याच पक्षाने त्यांना पाठिंबा न दिल्यामुळे संभाजीराजे यांनी निवडणुकीच्या रिंगणातून माघार घेतली होती. त्यानंतर संभाजीराजे यांनी शिवसेनेच्या भूमिकेविषयी नाराजीही व्यक्त केली होती. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांनी आज पुण्यातील एका कार्यक्रमात भाष्य केले. नगरसेविका प्राची आल्हाट यांच्या विकासनिधीतून उभारण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनाच्या लोकार्पण सोहळय़ाला राऊत यांनी हजेरी लावली होती. त्या वेळी ते बोलत होते.
राऊत म्हणाले, राजाला फक्त प्रजा असते, समर्थक नाही. संभाजीराजे, आपण राजकारणात आहात. चढ-उतार येत असतात, ते पचवता आले पाहिजेत. राज्यसभेच्या निवडणुकीसाठी ईडीचा वापर होईल, अशी भीती अनेकांना वाटत आहे. कोणी कितीही घोडे उधळू द्या. पण शिवसेनेचा सहाव्या जागेवरील उमेदवार कोणत्याही परिस्थितीत निवडून येईल.
कार्यकर्त्यांना संबोधताना ते म्हणाले, सगळय़ा संकटात आमची माणसे टिकून राहिली. आपण टिकून राहिलो म्हणून उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाले. उडून गेलेल्या कावळय़ांमुळे नव्हे, तर तुमच्यासारख्या मावळय़ांमुळे त्यांना मुख्यमंत्री होता आले, असेही त्यांनी सांगितले.