अध्याय अठरावा
भगवंत संन्यासाश्रमाबद्दल बोलत होते. ते म्हणाले, ज्याला खरोखर मुक्ती पाहिजे असेल, त्याने विषयांची निवृत्ती केली पाहिजे. म्हणून संन्याशाने मन आणि पाचही इंद्रिये जिंकावीत. भोग हे क्षुद्र आहेत असे समजून त्यांच्याबाबत विन्मुख असावे आणि आत्म्यातच परम आनंदाचा अनुभव घ्यावा. अशा प्रकारे माझ्याशी एकरूप होऊन राहावे. विषयासक्तीने बंधन निर्माण होते म्हणून विषयांचाच त्याग केला की, ‘मुक्ती’ सहज सिद्ध आहे. विषयाची विरक्ती हाती लागण्यासाठी साधकाने वैराग्य उत्पन्न होईल, तोपर्यंत यत्न करावा.
स्वधर्मकर्म करून ते मला अर्पण करावे. हेच वैराग्यप्राप्तीचे मुख्य साधन आहे. कर्म करून त्याचे कर्तेपण सोडून देणे ह्याचंच नाव ‘मदर्पण’ होय.
मदर्पणबुद्धीने कर्म करू लागले म्हणजे माझ्यावर प्रेम उत्पन्न होते आणि चित्ताला माझेच नाम, माझीच कीर्ती आणि माझेच चिंतन घडू लागते. अशी मजवर अत्यंत प्रीति जडली म्हणजे वैराग्य उत्पन्न होते आणि तेणेकरून विषयांची विरक्ती घडून हळू हळू माझ्या सुखाची प्राप्ती होते. माझ्या सुखाने माझे भजन अत्यंत वाढू लागते. आणि सर्व ठिकाणी माझीच ब्रह्मत्वाने भावना पूर्णपणे ठसते.
याकरिता सर्वत्र एक ब्रह्मच भरलेले आहे अशी भावना धरून, महासुखावरच लक्ष ठेवून मन वासनारहित होईपर्यंत संन्याशाने पर्यटन करीत असावे. पवित्र देश, नद्या, पर्वत, वने आणि आश्रमांनी परिपूर्ण अशा पृथ्वीवर फिरत राहावे. फक्त भिक्षेसाठीच नगर, गाव, गौळवाडा किंवा यात्रेकरूंच्या समूहात जावे.
चांगल्या चांगल्या पुण्यक्षेत्री फिरून पृथ्वीपर्यटन करावे. पवित्र असे कुरुक्षेत्र, अत्यंत पवित्र अशा सात पुऱया अयोध्या, मथुरा, गया, काशी, कांशी, अवंतिका, जगन्नाथपुरी व द्वारका.़ पुष्कर, प्रयागराज वगैरे तीर्थे, कृतमाला, पयस्विनी, पुण्यस्वरूप अशी ताम्रपर्णी, गोदावरी, नर्मदा, त्रिवेणी, परमपवित्र अशी गोमती, कृष्णा, वेण्या, तुंगभद्रा, तापी, पायोष्णी, चंद्रभागा, यमुना, भागीरथी, नीरा, किंवा गंगा समुद्राला मिळते तो संगम ऋष्यमूक, श्रीशैल, व्यंकटादि (व्यंकटगिरी), गौतमीतीरावरील ब्रह्मगिरी यांची यात्रा केली असता सर्व पातकांचा संहार होतो.
हिमालय पर्वत चढू लागले असता, प्रत्येक पावला-पावलाने पातकनाश होत होत, होत सर्व पातकांचा नाश होतो. याकरितां मुनिश्रे÷ांनी ती यात्रा अवश्य करावी. दंडकारण्य नांवाचे मोठे अरण्य, नैमिषारण्य, आनंदवन (काशीजवळ) इत्यादि वनांमध्ये संन्याशाने आवश्य जावे.
च्यवन, कपिल व व्यास यांचे आश्रम, गौतम व वामन यांचे उत्तमोत्तम आश्रम तसेच सर्व श्रमांचा परिहार करणारी बदरिकाश्रमासारखी श्रे÷ अशी जी पवित्र स्थळे आहेत, तेथें संन्याशाने आवश्य जावे. ज्या गावात मोठमोठाले रस्ते किंवा बाजार नसेल त्याला ‘ग्राम’ म्हणतात. तेथे जाऊन आपल्या भिक्षेचा नेम पूर्ण करावा. अंतःकरण शुद्ध होण्याकरिता वानप्रस्थाश्रमामध्ये जो पुरुष असेल, त्याच्या दारात भिक्षेकरिता मोठय़ा आदराने जाऊन उभे रहावे. कारण, सात्विकाचे अन्न सेवन केले असता साधकांच्या अंगीही प्रत्येक घासाला शुद्धसत्त्वपणा उत्पन्न होतो. असा शुद्ध अन्नाचा महिमा आहे. ह्याकरिता वानप्रस्थाचे दार पाहून तेथे वारंवार जात असावे. तेणेकरून साधकांची अनिवार सत्त्वशुद्धी होते व वासनाही निःशेष नाहीशी होऊन आत्मशांती प्रगटते.
निःशेष वासना गेली म्हणजे जग सत्यत्वाने दिसतच नाही मग विषयासक्ती कोठची ? तेव्हां अर्थातच उत्कट वैराग्य उत्पन्न होते. संन्याशाने दृश्य जगाला सत्य मानू नये कारण ते नाश पावते. कोठेही आसक्ती नसावी इहलोकी किंवा परलोकी काहीही करण्याची इच्छा बाळगू नये.
उद्धवा, या लोकामध्ये जे जे म्हणून दिसते ते ते नाश पावते, हे सर्वांना प्रत्यक्ष दिसतेच परंतु विषयाला वश होऊन व त्यांत गुंतून पडून अज्ञानी लोक भुलतात. पण शुद्ध भिक्षेच्या प्राप्तीने, संन्याशाची वृत्ती शुद्धसत्त्वात्मक झाली की, त्याला विषय हे सत्यत्वाने दिसतच नाहीत.
क्रमशः