वार्ताहर/ परळी
काही लोकांच्या डोळय़ात पाणी येतं तेव्हा मग दुष्काळी भागाला पाणी मिळतं अशीच काहीशी कथा हि धरणग्रस्थांची असते. उरमोडी धरणग्रस्थांचे प्रश्न हे खूप दिवसांपासून प्रलंबित आहेत. तुम्हाला ज्या वेदना होत आहेत. त्या मी समजु शकतो कारण पाटण परिसरातील प्रकल्पग्रस्तांच्या अडचणी ह्या समोरुन पाहिल्या आहेत. तसेच आपले लोकप्रतिनिधी खासदार श्रीनिवास पाटील हे 35 वर्ष प्रशासकीय सेवेत कार्यरत असल्याने ज्या काही तांत्रिक अडचणी येत आहेत त्या सोडवून धरणग्रस्तांच्या मागण्या पुर्ण करण्यासाठी आम्ही कटीबध्द आहोत असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस आयटीसेल प्रदेशाध्यक्ष सारंग पाटील यांनी नित्रळ येथील गणेश मंडळाला भेटी प्रसंगी केले.
कोरोना काळानंतर पहिल्यांदाच सगळीकडेच गणेशउत्सवाची धामधूम असताना सोमवार दिनांक 5 सप्टेंबर रोजी सारंग पाटील यांनी परळी खोऱयातील आरगडवाडी, सायळी, दहिवड, सावली, कुरुळ, नित्रळ, कुस खुर्द, कुस बुद्रुक, आंबवडे बुद्रुक येथील गणेश मंडळाच्या भेटी-गाठी घेत येथील धरणग्रस्त भागातील प्रश्न अडचणी समजून घेतल्या. ज्या भागातील गावांमध्ये निधी मंजूर झाला आहे तसेच काही कामे पुर्ण झाली आहेत अशा गावांनी सारंग पाटील यांचे आभार व्यक्त केले.
यावेळी सारंग पाटील पुढे म्हणाले, खासदार श्रीनिवास पाटील हे 2008 साली कराड मतदार संघाचे खासदार असल्याने आपल्या भागाकडील समस्या ह्या समजून घेता आल्या नाहीत. मात्र आता सातारा-कराड हे एकत्र मतदार संघ झाल्याने आता आपल्या भागातील ज्या काही अडचणी, समस्या असतील त्या निसंकोच सांगा आम्ही सोबतच आहोत. खासदार श्रीनिवास पाटील हे स्वतः 35 वर्ष प्रशासकीय सेवेत आहेत. तर त्यांनी पुण्यासारख्या शहरात कलेक्टर म्हणून कामकाज यशस्विरित्या पार पाडले तिथे तर त्यावेळी 18 धरणे व तेथील समस्या तत्काळ मार्गी लावण्यात महत्वाची भुमीका घेतली होती. त्यामुळे तुमच्या ज्या काही समस्या आहेत याच्या प्रशासकीय बाब तपसून अभ्यासपुर्ण माहिती घेत प्रश्न मार्गी लावण्यात येतील असे अश्वासन यावेळी देतो.
मंडळांना भेटींचे भिरकीट
सोमवारी सारंग पाटील यांनी परळी खोऱयातील गणेश मंडळाना भेटी देवून तेथील ग्रामस्थांनी चर्चा करत अडचणी समजून घेतल्या यामुळे राष्ट्रवादीने परळी भागाला केंद्रस्थानी धरत भाग पिंजून काढला आहे तसेच निधी देखील खासदार श्रीनिवास पाटील यांच्या माध्यमातून गावांना मिळत असल्याने या मंडळांच्या भेटींमुळे राजकीय चर्चाना उधाण आले आहे.