वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
येथे सुरु असलेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील सामन्यात दिल्ली संघाविरुद्ध खेळताना मुंबईच्या सर्फराज खानने दमदार शतक झळकवले. रणजीच्या या मोसमामध्ये सर्फराज खानने सातत्याने धावा जमवल्या असल्या तरी राष्ट्रीय संघात स्थान मिळाले नसल्याने तो पुन्हा नाराज झाला आहे.
दिल्ली आणि मुंबई यांच्यातील या सामन्यात खेळाच्या पहिल्या दिवशी मुंबईचा पहिला डाव 79.2 षटकात 293 धावात आटोपला. 25 वर्षीय सर्फराज खानने 155 चेंडूत 125 धावा झोडपल्या. पृथ्वी शॉने 40 धावा केल्या. दिल्लीतर्फे पी. विजयारन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 66 धावात 4 गडी बाद केले. मुंबई संघाकडून खेळताना गेल्या दोन रणजी मोसमामध्ये सर्फराज खानने 12 सामन्यात 136.42 धावांच्या सरासरीने 1910 धावा जमवल्या असून त्यामध्ये 7 शतके आणि 11 अर्धशतकांचा समावेश आहे. 2019 पासून मुंबईचे प्रतिनिधीत्व करताना सर्फराज खानने 22 डावात 2289 धावा जमवल्या असून त्यामध्ये एक त्रिशतक, दोन द्विशतके, 9 शतके आणि पाच अर्धशतकांचा समावेश आहे. फेब्रुवारी महिन्यात भारताच्या दौऱयावर ऑस्ट्रेलियन संघ खेळणार असून कसोटी मालिकेत राष्ट्रीय संघात सर्फराज खानची निवड होईल असे वाटत होते पण पुन्हा त्याच्या पदरी निराशा पडली आहे.
राजकोटमध्ये सुरू असलेल्या आंध्र आणि सौराष्ट्र यांच्यातील रणजी सामन्यात पहिल्या दिवसाअखेर आंध्रने 90 षटकात 5 बाद 256 धावा केल्या. रिकी भुईने 80 धावा जमवल्या असून सौराष्ट्रच्या धर्मेंद्रसिंग जडेजाने 80 धावात 3 गडी बाद केले आहेत.
चेन्नईमध्ये सुरू असलेल्या रणजी सामन्यात आसाम विरुद्ध खेळताना तामिळनाडूने पहिल्या डावात 4 बाद 386 धावा झळकवल्या. तामिळनाडूच्या नारायण जगदीशनने 125 धावा जमवल्या असून पी. रंजन पॉल 99 धावा खेळत आहे. बाबा इंद्रजितने 77 धावा केल्या. विजय शंकर 53धावावर खेळत आहे. पुणे येथे सुरू असलेल्या रणजी स्पर्धेतील सामन्यात महाराष्ट्रने हैद्राबादविरुद्ध दिवसअखेर पहिल्या डावात 5 बाद 353 धावा जमवल्या. महाराष्ट्राच्या नौशाद शेखने 145, केदार जाधवने 71 धावा जमवल्या. आशय पालकरने 61 धावावर खेळत असून हैद्राबादच्या काकने 76 धावात 3 गडी बाद केले आहेत.