Sarpanch Direct Election In Maharashtra : शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आल्यानंतर मविआने घेतलेल्या अनेक निर्णयाला स्थगिती देण्यास सुरुवात केली आहे. आज झालेल्या पावसाळी अधिवेशनातही मोठा निर्णय घेत ठाकरे सरकारला दणका दिला आहे. आता सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचं विधेयक मंजुर करण्यात आलं आहे.त्यामुळं आता यापुढे राज्यात ग्रामपंचायतींमध्ये सरपंचांची थेट जनतेतून निवड होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्याचे ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी आज विधानसभेत थेट जनतेतून सरपंचांची निवड करण्याचं विधेयक मांडलं. या विधेयकाला बहुमतानं पारीत करण्यात आलं आहे. त्यामुळं आता राज्यात यापुढे सरपंचांची निवड थेट जनतेतून होणार आहे. याशिवाय महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ च्या संबंधित कलमांमध्येही शिंदे सरकारकडून सुधारणा करण्यात आल्या आहेत.
महाविकास आघाडी सरकारनं राज्यातील ग्रामपंचायतींमध्ये थेट जनतेतून सरपंच निवडीच्या निर्णयाला स्थगिती दिली होती. मात्र या सरकारनं सरपंच निवडीचा मार्ग मोकळा केला आहे.देवेंद्र फडणवीस हे २०१६ मध्ये राज्याचे मुख्यमंत्री असताना त्यांनी राज्यात सरपंचांची निवड थेट जनतेतून करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर २०१९ मध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर तात्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी हा निर्णय रद्द केला, परंतु राज्यात पुन्हा सत्ताबदल झाल्यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाकरे सरकारनं याबाबत घेतलेला निर्णय रद्द करत सरपंचांची थेट जनतेतून निवड करण्याचा निर्णय घेतला आहे.


previous post