प्रतिनिधी / सातारा :
सातारा शहर हे ऐतिहासिक शहर आहे. याच शहरात अनेक जुन्या इमारती आहेत. काही वादातित इमारती आजही जीर्ण अशा अवस्थेत आहेत. या इमारतींपासून धोका असल्याने पालिकेकडून वारंवार त्या इमारत मालकांना नोटीसा बजावल्या गेल्या जातात. परंतु इमारतींचे मालक हे काही ठिकाणी हयात नसतात किंवा काही ठिकाणी न्यायालयीन प्रलंबित दाव्यामुळे त्या इमारतीचा करही भरला जात नाही आणि इमारतीही उतरवल्या जात नाही. आता शहरातील अशा 350 धोकादायक इमारती (350 dangerous buildings) पालिका (municipal corporation) उतरवणार आहे. त्या इमारतींकरता एक ठेका नेमून हे काम करण्यात येणार आहे.
शहरात बहुतांशी पेठांमध्ये जुन्या अनेक इमारती आहेत. त्यातील हेरिटेज इमारती वगळता इतर धोकादायक इमारतीं जीर्ण अवस्थेत असल्याने त्यांपासून धोका दरवर्षी पावसाळय़ात संभवतो. पावसाळय़ापूर्वी पालिका दरवर्षी त्या इमारतीच्या मालकास नोटीस बजावण्याचे काम करते. परंतु नोटीस बजावून इमारत उतरवली जात नाही. काही ठिकाणी नोटीस त्या इमारतीच्या दारावर पालिका चिटकवते परंतु त्या इमारतीचे मालक हे हयात नसतात किंवा या शहरात नसतात. त्यामुळे पालिकेनी दिलेली नोटीस ही त्या इमारतीच्या दारावरच असते. धोका अधिकच वाढत असतो. नुकतीच सातारा पालिकेची प्रशासकीय सभा पार पडली. त्या सभेत अशा जीर्ण व जुन्या झालेल्या इमारती उतरवून घेण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. या इमारतीं उतरवण्यासाठी एक ठेकेदार नेमण्यात येणार आहे. अशी ही चर्चा झाली होती. त्याप्रमाणे येत्या काही दिवसात मोडकळीस आलेल्या इमारती पालिका उतरवून घेणार आहे.