प्रतापसिंहनगर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात, काळय़ा धद्यांचं साम्राज्य वाढले, आमदारांचे नाव घेऊन गुंता वाढला
प्रतिनिधी / सातारा :
ऐतिहासिक सातारा शहराच्या नावलौकिकात गुंड दत्ता जाधव याची कारकिर्द काळय़ा अक्षरात लिहिली आहे. मोक्कातंर्गत कळंबा जेलमध्ये जेरबंद असलेला दत्ता जाधव साताऱ्यात नव्याने जन्माला येणं लौकिकाला परवडणारे नाही. बेकायदा दारु विक्री, मटका, जुगार या बरोबरच आर्थिक गुन्हेगारी आणि जमीन, फ्लॅट, बंगला यांच्यावर अनाधिकृत ताबा मिळवण्याचे प्रमाण झपाटय़ाने वाढले आहे. दरम्यान, प्रतापसिंहनगरातल्या कांता कांबळेला मोक्का लावा यासाठी आख्खी ग्रामपंचायत सरसावल्यामुळे नव्या दत्ता जाधवचा विषय ऐरणीवर आला आहे. दरम्यान, प्रतापसिंहनगरातल्या काळे धंदे वाल्यांनी आमदार महेश शिंदे यांचे धडधडीत नाव घ्यायला सुरुवात केल्यामुळे या प्रकरणाला राजकीय किनार आली आहे.
प्रतापसिंहनगर झोपडपट्टी, खेड, संगमनगर, कृष्णानगर, वाढे हा परिसर गेल्या 15 वर्षांपासून गुंड दत्ता जाधवच्या दहशतीखाली होता. शेकडो गुन्हय़ांची मालिका रचणारा दत्ता जाधव आणि त्याची गँग जेरबंद करण्यात पाच ते सहा पोलीस अधीक्षकांना अपयश आले होते. अखेर दत्ता जाधवला अटक करुन मोक्का लावण्यात आल्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून साताऱ्याच्या पूर्व भागाने निश्वास सोडला. शासकीय मेडिकल कॉलेज होऊ घातलेल्या या भागात शांतता नांदू लागली असताना या भागात नवा दत्ता जाधव जन्माला येऊ घातल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गुंडगिरी सोडून कामाधंद्याला लागलेली शेकडो तरुण पुन्हा नव्या दत्ता जाधवच्या संगतीला जोडले जात आहेत.
आर्थिक गुन्हेगारी झपाट्याने वाढते आहे
सातारा शहराच्या वाढीला पश्चिमेकडे मर्यादा आहेत. पोवईनाका हा हार्ट ऑफ सिटी असले तरी हा सेंटर बॉम्बे रेस्टॉरंटच्या दिशेने बदलत आहे. त्यामुळे खेड ते माहुली या दरम्यान शहरीकरण मोठय़ा वेगात वाढत आहे. त्यातच कांता कांबळे व अन्य लोकांनी आर्थिक गुन्हेगारी करत आपली दहशत वाढवली आहे. मोकळय़ा जागांवर झोपडपट्टी लावणे, हवे त्या वेळेला ती काढून घेणे, मोकळे बंगले, फ्लॅट आणि जागांचा ताबा घेऊन करोडो रुपये मागणे असे प्रकार सर्रास घडत असून यांच्या दहशतीमुळे पाच टक्के सुद्धा तक्रारी पोलिसांपर्यंत पाहोचत नाहीत.
वाढे फाटा येथील काही दिवसांपूर्वी दुकानांना लागलेल्या आगीनंतर त्याच ठिकाणी पुन्हा नव्याने दुकाने उभारणी करताना झालेली मारामारी व वाद शहर पोलीस ठाण्यात पोहोचला असून या प्रकरणी आठ जणांविरोधात विविध कलमा अंतर्गत गुन्हे दाखल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारात एक नाव पुढे येत आहे ते म्हणजे खेडमधील कांता कांबळे याचे. दत्ता आत असल्याने या ठिकाणची गुंडगिरी दहशत काळे धंदे कमी झाले मात्र कालच्या प्रकरणात कांता कांबळे यांच्यावर केलेल्या आरोपानुसार या ठिकाणी पुन्हा गुंडगिरी काळेधंदे वाढते की काय अशी भीती निर्माण झाली असून या परिसरात कायदा आणि सुवेवस्था निर्माण करण्याचे आव्हान कायमच सातारा पोलिसांवर असणार आहे.