दुर्घटना घडण्याची शक्यता; महावितरणचे कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर कामकाज सुरु; सातारा शहरालाही फटका; शहापूर योजनेचा पाणी पुरवठा विस्कळीत
सातारा प्रतिनिधी
गेल्या तीन दिवसापासून वादळी वाऱ्यासह पावसाने जिह्यात दैयनिय अवस्था केली आहे. गुरुवारी सकाळपासूनच वाऱ्याचा वेग व पावसाची उघडझाप सुरु होती. यामध्ये अनेक ठिकाणी झाडांबरोबरच विद्युत पोलही उन्मळून पडल्याच्या घटना घडल्या. त्यामुळे बहुतांशी ठिकाणचा विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला होता. ग्रामीण भाग गेल्या तीन दिवसांपासून अंधारातच असून विद्युत पुरवठा पूर्ववत करण्यासाठी महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांकडून युद्ध पातळीवर काम सुरु आहे.
गेल्या तीन दिवसांपासून जिह्यात वादळी वाऱ्यांसह जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणचे झाडे पडली आहेत. विद्युत वाहक पोल पडलेले आहेत. मात्र, कुठल्याही घरावरचे पत्रे उडून नुकसान झाल्याचे अद्याप ऐकिवात नाही. सातारा तालुक्यातील काशीळ येथे महामार्गालगतचे झाड पडले होते. मेढा जाणाऱ्या रस्त्यावरही पोल उन्मळून पडले होते. परळी भागातही झाडे पडल्याच्या घटना घडलेल्या असून त्यामुळे विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. गेल्या चार दिवसांपासून परळी भागात लाईटच नसल्याने तेथील गिरण्या बंद, मोबाईलचे बॅटऱ्या डाऊन झालेल्या आहेत. तर रॉकेलही आता पूर्वीसारखे मिळत नसल्याने मेणबत्तीच्या आधारावर रात्र काढावी लागत आहे. जिह्यात ठिकठिकाणी झाडे पडल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
महावितरण कंपनीकडून युद्ध पातळीवर काम सुरु
विद्युत पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी सातारच्या महावितरण कंपनीतील कर्मचाऱ्यांनी युद्ध पातळीवर काम सुरु ठेवले आहे. मात्र, सायंकाळी उशीरापर्यंत वाऱ्याचा वेग कमी झालेला नव्हता. त्यासाठी परिस्थिती जीवाचे रान करुन कर्मचारी काम करताना दिसत होते.
सातारा शहरालाही फटका
सातारा शहरात करंजेनाका परिसरात झाडे पडल्याने दोन पोल उन्मळून पडल्याची घटना घडली. तसेच अंजली कॉलनीत झाड पडले होते. पोल उभे करण्याचे काम दिवसभर सुरु होते. महावितरणचे अभियंता जितेंद्र माने हे कर्मचाऱ्यांकडून काम करवून घेत होते. तसेच शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या शहापूर उपसा योजनेच्या पंप हाऊसला होणारा विद्युत पुरवठाही खंडीत होत होता. त्यामुळे गुरुवार टाकी, गणेश टाकी, यशवंत टाकी, घोरपडे टाकी, राजवाडा टाकी, बुधवार नाका टाकीमधून अपूऱया दाबाने पाणी पुरवठा झाला आहे. दरम्यान, सातारकर नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करावा, असे आवाहन अतिरिक्त मुख्याधिकारी पराग कोडगुले यांनी केले आहे.