अचूक बातमी “तरूण भारत”ची, शुक्रवार 29 एप्रिल 2022, सकाळी 11.45
● राज्यासह जिल्ह्यात परिस्थिती पूर्ण आटोक्यात
● शिवजयंतीसह इतर उत्सवांचा उत्साह वाढला
सातारा / प्रतिनिधी :
देशातील काही राज्यात कोरोना रूग्णांची वाढ होत असली तरी महाराष्ट्रात परिस्थिती आटोक्यात आहे. सातारा जिल्ह्यात आज सलग आठव्या दिवशी एकही नवा रूग्ण आढळलेला नाही.राज्यपातळीवरील मास्कसक्तीचा निर्णयही लांबणीवर पडला आहे. जिल्ह्यात शिवजयंती, रमजान, महात्मा बसवेश्वर जयंतीसह अक्षय तृतीया सणाचा उत्साह वाढलेला दिसत आहे.
1 मे रोजी बुस्टर डोस अभियान
जिल्ह्यात कोरोना लसीकरणाचा वेग कायम असून महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून 1 मे रोजी अनेक नगरपालिकांनी जेष्ठ नागरिकांसाठी विशेष बुस्टर डोस अभियान राबवण्याचे नियोजन केले आहे. घर टू घर फिरून जेष्ठ नागरिकांनी बुस्टर डोस घेतला आहे का? याची तपासणी करून त्यांना डोस घेण्यास प्रवृत्त केले जाणार आहे. भविष्यातील धोका ओळखून जिल्ह्यातील मलकापूरसह अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांनी हा उपक्रम जाहिर केला आहे.
उत्सवांचा उत्साह वाढला
जिल्ह्यात सलग आठव्या दिवशी एकही नवा रूग्ण न सापडल्याने जिल्हावासियांत सुखद वातावरण आहे. महाराष्ट्र दिनासह शिवजयंती, महात्मा बसवेश्वर जयंती, रमजान ईद यासह अक्षय तृतीया उत्साहात साजरी होण्याची चिन्हे आहेत. त्या दृष्टीने नियोजन सुरू आहे.
शुक्रवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण चाचण्या-25,77,431
एकूण बाधित-2,79,230
एकूण मुक्त-2,71,854
एकूण मृत्यू-6,683
उपचारार्थ रुग्ण-0