सेना भवन ट्रस्टच्या नावावर; उदयनराजे शिवसेनेत आले तर आम्हाला आनंद; स्थगिती दिलेली डीपीसीची सर्व कामे पडताळणीनंतर सुरु होतील; डोंगरी भागाच्या विकासासाठी प्राधान्य देणार
सातारा / प्रतिनिधी
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पास ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव देण्यात यावे यासाठी मी स्वतः मागणी केली आहे. त्यांचेच सुपूत्र उद्धव साहेब मुख्यमंत्री असताना का झाले नाही याची मलाही खंत वाटते आहे. तसा प्रस्तावही माझ्याकडून पाठवण्यात आला होता. पुन्हा बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याचा प्रस्ताव पाठवून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत मंत्री शंभूराज देसाई यांनी दिली. दरम्यान, सेना भवन हे ट्रस्टच्या नावावर आहे, असे समजते. आम्ही जे शिवसेनेचे कार्यालय सुरु करणार आहोत ते शिवसेनेच्या नावाने असणार आहे, असे सांगत मंत्री देसाई एका प्रश्नाला उत्तर देताना म्हणाले, उदयनराजे म्हणत असतील माझी शिवसेना आहे तर आम्हाला अत्यानंद आहे, असे सांगत डीपीसीची स्थगित कामे पडताळणी करुन लवकरत सुरु होतील असेही त्यांनी सांगितले.
मंत्री शंभूराज देसाई हे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. मंत्री देसाई म्हणाले, प्रशासनाची बैठक घेतली. बैठकीत जिह्यात कुठले प्रश्नाला प्राधान्य दिले पाहिजे, सुचना देण्यात आल्या. धरणांच्या पाण्याची नदी काठच्या लोकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या सुचना दिलेल्या आहेत. जिह्याचा 400 कोटींचा विकास आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सध्या रुटींन कामांचा आढावाही घेतला. तात्कालिन पालकमंत्र्यांनी घाईगडबडीत कामांना मंजूरी दिली होती. ज्या कामांबाबत मुख्यमंत्र्यांकडे तक्रारी झाल्यानंतर डीपीसीच्या कामांना मुख्यमंत्र्यांनी स्थगिती दिली. लववकरच या कामाची पडताळणी करुन कामे सुरु होतील. डोंगरी तालुक्यातील पर्यटनाचा वाव आहे. जलसंपदा प्रकल्पातील रखडलेल्या कामांना वेग येईल. रस्त्याच जाळ चांगले केले जाईल, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेद्र फडणवीस हे लवकरच पालकमंत्री नेमणूक करतील, असे सांगत ते म्हणाले, मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितले आहे की आपल्या हातात अडीच वर्षे आहेत. दुप्पट वेगाने काम करू, असे सांगत सध्या कर्जाची स्थिती राज्यावर आहे. ते सुधारण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहे. त्यावर निती आयोगाच्या बैठकीत चर्चा झाली आहे. 18 हजार कोटी मिळणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी सकारात्मक आहेत. केंद्र आणि राज्य एका विचारांचे असून राज्याला जास्त निधी येईल, त्याचा फायदा सातारा जिह्याला होईल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
डोंगरी आणि पूनर्वसनावर भर
सातारा जिह्यात 8 तालुके डोंगरी आहेत. त्या तालुक्यांचा विकास झाला पाहिजे यासाठी मी काल मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली आहे. जेवढे महाराष्ट्रात डोंगरी तालुके आहेत. त्या तालुक्यांच्या विकासासाठी वेगळा हेड तयार करण्यात येणार आहे. त्याबाबत प्राथमिक चर्चा झाली आहे. पूनर्वसनाचा विषय झाला आहे. राज्यात ठिकठिकाणी जलसंपदा विभागाचे काम संथ गतीने सुरु आहे. विविध संघटनांकडून जो होणारा विरोध आहे. त्यावरही मार्ग काढण्यात येईल, असे सांगत डोंगरी भागातील रस्त्यांसाठी, तेथील पाणी पुरवठा योजनेंसाठी विशेष प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले. तसेच कोयना धरण क्षेत्रात कोठे बोटींग करण्याबाबत गृहखात्यांचा मंत्री असताना बैठक घेतली होती. कुठल्या स्पॉटला करता येईल हेही त्यावेळी पाहिले आहे. त्यावर लक्ष दिले जाईल. बामणोली, तापोळा यासाठी जिल्हा परिषदेच्यावतीने एक स्पीड बोट घेण्यात येणार आहे, असेही सांगितले.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत खंत
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाला हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्याची अनेकदा मागणी केली होती. तसा प्रस्तावही पाठवला होता. विधानसभेतही मागणी केली होती. मात्र, बाळासाहेबांचे सुपुत्र उद्धवसाहेब हे मुख्यमंत्री असताना नाव दिले नाही याची खंत आहे. आताही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे याबाबत मागणी करणार असेही मंत्री देसाई यांनी सांगितले. दरम्यान, आमची मुळची शिवसेना आहे. शिवसेना भवनाची जागा एका ट्रस्टच्या नावावर आहे, असे समजते. आम्ही शिवसेनेचे कार्यालय सुरु करणार आहोत ते शिवसेनेच्याच नावावर असेल, असेही त्यांनी सांगितले.
तुमच्या तेंडात मरळीची साखर पडो
पत्रकारांनी फोन करुन शुभेच्छा दिल्याच्या सांगत पत्रकारांनी पालकमंत्री तुम्हीच झाला तर असा प्रश्न छेडल्यावर आपल्या तोंडात मरळी कारखान्याची साखर पडो. अजिंक्यताऱयाची पण चालेल तेही युतीत आहेत, असे उत्तर दिले. पत्रकारांना डीपीसीत प्रवेश असेल का यावर ते म्हणाले, मागच्या पालकमंत्र्यांनी जे नियम केले तेच मी पुढे करणार आहे. नाही तर ते माझ्यावर रागावतील, असे सांगितले.
राजें शिवसेना माझी आहे म्हणत असतील तर आनंद
पत्रकारांनी उदयनराजे शिवसेना माझी आहे म्हणताहेत त्याबाबत छेडले असता ते म्हणाले, आम्हाला आनंद आहे. ते जर शिवसेनेत येत असतील तर मोठया मनाने जंगी स्वागत करु. परंतु एक प्रोटोकॉल ठरलेला आहे. आम्ही भाजपाला डिस्टर्ब करायचे नाही. त्यांनी आम्हाला नाही करायचे. त्यानुसार सर्व काही होईल. राजें माझे चांगले मित्र आहेत, असेही मंत्री देसाई यांनी सांगितले. पूर्वी त्यांच्यात आणि आमच्यात जास्त अंतर होते. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत संसार करत होतो. आता भाजपा-शिवसेनेची युती असून आता जवळचे संबंध आहेत, असेही त्यांनी सांगितले.
मकरंद पाटील आले तर चांगलेच
जिह्याच्या विकास सर्वांना सोबत घेऊन केला जाईल. जे सकात्मक मुद्दे मांडतील त्याचा विचार केला जाईल असे सांगत जिह्यात महायुतीचे 8 ही आमदार होतील यासाठी प्रयत्न केले जातील, असे सांगत देसाई म्हणाले, आमदार मकरंद पाटील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली त्याबाबत पत्रकारांनी छेडले असता ते म्हणाले, त्यांची आणि माझी ओझरती भेट झाली, ते लगेच महाबळेश्वरवरुन पुढे गेले. त्यांचा मतदार संघ असल्याने ते मुख्यमंत्र्यांशी भेटले असतील. ते शिवसेनेत आले तर चांगलेच, असेही त्यांनी सांगितले.
उद्या मतदार संघात या शिवसेनेची ताकद दाखवतो
आदित्य ठाकरेंनी मल्हारपेठला गर्दी केल्याबाबत छेडले असता देसाई म्हणाले, उद्या मतदार संघात या बघायला. तुम्हाला शिवसेनेची ताकद दाखवतो. त्यांच्या सभेतले सोशल मीडियावरचे फोटो पाहिले. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कोण कोण होते ते नावानिशी माहिती आहेत. तसेच ज्यांची पाकिटे सभेत मारली केली. ते जिह्याबाहेरचे होते. तालुक्यातील एकाचेही पाकिट गेले नसल्याचे सांगत देसाई म्हणाले, जिह्यातील शिवसेना आहे तशीच आमच्या पाठीशी आहे. पदाधिकारी आहेत, असे सांगत त्यांनी मुंबई पालिकेसह राज्यातील सर्वच निवडणूका शिवसेना भाजपा महायुतीच्या माध्यमातून लढवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.