सातारा / विशेष प्रतिनिधी :
साऱ्या महाराष्ट्रात आणि देशात धार्मिक द्वेषाची बीजे रोवली जात असताना स्वराज्याची राजधानी असणाऱ्या साताऱ्याने सर्वधर्मिय महाआरतीने मंगळवारी इतिहास घडवला. मशिदीवरील लाऊड स्पीकर विरुध्द हनुमान चालीसा अशी तेढ निर्माण होत असताना साताऱ्यात हिंदू, मुस्लीम, बौध्द, शिख, ख्रिश्चन अशा सर्व धर्मियांनी राजवाडासमोरील हनुमान मंदिरासमोर महाआरती करत अक्षयतृतीया व रमजान ईदच्या एकमेकांना शुभेच्छा दिल्या. कायदा सुव्यवस्था राज्यभर बिघडली असताना साताऱ्यात पार पडलेली ही महाआरती ‘महाराष्ट्रातील एकमेव’असल्याचे स्पष्ट झाले. दरम्यान, ‘तरुण भारत’ने गेल्या 15 दिवसांपासून सलोखा परिषदेच्या माध्यमातून जे वातावरण केले त्याचेच हे यश असल्याचे उपस्थित साऱ्यांनी स्पष्टपणे बोलून दाखवले.
जहांगिरपुरीनंतर महाराष्ट्रातील धार्मिक तेढ वाढीला लागून कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल आहे. राज्य पोलीस दलाबरोबर निमलष्करी दले सज्ज ठेवली असताना रमजान ईदच्या पार्श्वभूमीवर संपुर्ण महाराष्ट्रातील महाआरत्यांचे नियोजन रद्द करण्यात आले. धार्मिक तेढ तयार होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’चे आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांनी ‘सलोखा परिषदे’ची संकल्पना मांडली. यासाठी गेल्या 15 दिवसांपासून सर्वधर्मिय बैठकांची आवर्तने सुरु होती. वाटेल त्या परिस्थीत शहराचा सलोखा बिघडू न देता सातारा महाराष्ट्रला सलोख्याचा संदेश देईल, असा दृढ निश्चय करण्यात आला होता.
सन्मान एकमेकांच्या धर्मांचा यामुळेच मंगळवारी साताऱ्याने इतिहास निर्माण केला. मंगळवार उजाडला तोच राज्यभरातील तणावाने. पोलीस यंत्रणा साऱ्या हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून असतानाच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाप्रमुख युवराज पवार, शहरप्रमुख राहुल पवार आदींनी राजवाडय़ावरील हनुमान मंदीरासमोर हिंदूची गर्दी होवू लागली. पोलीसांचा पहारा वाढला अन् मुस्लीम बांधवांचे आगमन झाले त्यापाठोपाठ बौध्द धर्मियांसह अन्य धर्मियांची गर्दी झाली असली तरी सर्वांमध्ये सौदाहार्याचे वातावरण होते. प्रत्येक जण एकमेकांची गळाभेट घेवून अक्षयतृतीया आणि रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.
सर्वधर्मिय आणि सर्व पक्षीय
हनुमान मंदीरासमोर झालेल्या पाच आरत्या, मंत्रपुष्पांजली दरम्यान सर्व धर्माचे तसेच सर्व पक्षाचे पदाधीकारी उपस्थित होते. पक्षाच्या कोणत्याही आदेश, सुचनेशिवाय सलोख्याची भूमिका पटली म्हणून आम्ही सहभागी झालो असल्याचे अनेकांनी सांगितले. संपूर्ण उपक्रमांत प्रत्येकाने एकमेकांच्या धर्माचा आदर करत जो संदेश दिला तो मंगळवारी रात्री उशीरापर्यंत सोशल मिडीयावर तुफान व्हायरल झाला. प्रत्येक व्हिडीओला मिलीयन्समध्ये लाईक्स आहेत.
आज महाआरती उद्या शिरखुर्मा
मंगळवारी महाआरती झाली अशाच पध्दतीने सर्वधर्मियांसाठी बुधवारी शिरखुर्म्याचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळीही इतकाच प्रतिसाद मिळेल असे सर्वांनी सांगितले. महाआरतीला प्रसिध्द व्यवसायीक सलीम कच्छी, गुरुवार परज मशिदीचे मुख्तार पालकर, रिपाईचे किशोर गालफाडे, अहमद कागदी यांनी पुढाकार घेत आपआपल्या समाज, संघटना, पक्ष यांना कोणत्याही अभिनिवेषाशिवाय या उपक्रमात सहभागी करुन घेतले.
“तरुण भारत”मुळेच….
महाराष्ट्रातील एकमेव महाआरती साताऱयात झाली ती ‘तरुण भारत’मुळेच अशा प्रतिक्रीया व्यक्त करत सर्वधर्मियांच्यावतीने आवृत्ती प्रमुख दीपक प्रभावळकर यांचा सन्मान करण्यात आला.
‘राजसाहेब आमच्या ह्रदयात’
काही इलेक्ट्रॉनिक माध्यमांचा खोडसाळपणा समोर आला तरी राजसाहेब आमच्या ह्रदयात आहेत. त्यांचे स्थान अढळ आहे. आम्ही कट्टर मनसैनिक असल्यामुळेचे महाआरतीला पक्षाने उदारअंतकरनाने मान्यता दिली. समस्त सातारकरांचे मी आभार मानतो. – युवराज पवारमनसे जिल्हा प्रमुख