वार्ताहर/कास
सातारा: कास बामणोली परिसरात गेल्या आठ दहा दिवसापासुन पावसाची जोरदार बॅटिंग सुरु असून सर्वत्र ओढे, नाले दुथडी भरून वाहत आहेत. सातारा शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या कास तलावच्या पाणी पातळीतही झपाट्याने वाढ होत असून जुनी साठवण पातळी क्षमता पाण्याने ओलांडली असून नव्या साठवण पातळीकडे वाटचाल सुरु आहे. यावर्षी सातारकरांना मुबलक पाणी साठा उपलब्ध होऊन पाणी टंचाईच संकट आता कायमच दुर होणार आहे.
सुरवातीला जुन महिन्यात पावसाने चांगलीच ओढ दिली होती. मात्र गेल्या आठ दहा दिवसांपासून यापरिसरात पाऊस जोरदार कोसळत असल्याने शेतकरी वर्गही सुखावला आहे. ओढे नाले दुथडी भरून वाहत असल्याने कोयना, उरमोडी, कण्हेर, तारळी नदी व कास तलावच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. पावसाने जुनमधील कसर या आठ-दहा दिवसात भरुन काढली आहे.
हे ही वाचा : राधानगरी धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार
सातारा शहराला मुबलक पाणीसाठा व्हावा म्हणून कास धरणाच्या भिंतीची उंची वाढवण्याचे काम गेल्या तिन वर्षांपासून सुरु आहे. धरणाच्या भिंतीचे व सांडव्याचे काही अपवाद तुरळक काम वगळता ९५ टक्के काम पुर्ण झाले असल्याने धरणात यावर्षी मोठ्याप्रमाणात पाणीसाठा होणार आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे तलावच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होऊ लागली असून जुनी २० फुट उंचीची पातळी पूर्ण होऊन पाणी पातळी २४ फुटांवर पोहोचली आहे. यावर्षी ४० फुट उंचीपर्यंत पाणी साठवले जाणार असून ६ फुट पाणी पातळी अद्याप भरण्यास शिल्लक आहे. पुढील आठ दहा दिवस पावसाची मुसळधार अशीच सुरु राहिल्यास धरण पूर्ण क्षमतेने भरून नवीन सांडव्यातून पाणी वाहण्याची स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे या वर्षी सातारकरांना मुबलक पाणी साठा उपलब्ध होणार आहे.