ऑनलाईन टीम/तरुण भारत
कोल्हापूर (Kolhapur), सांगली(Sangli) आणि सातारा (Satara) जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. कोयना धरण (Koyna Dam) पाणलोट क्षेत्रासह तालुक्याला मुसळधार पावसानं झोडपून काढलंय. यामुळे धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढली आहे. ५ वाजता धरणाची पाणी पातळी २१४७ फूट ०० इंच इतकी होती. तर धरणामध्ये ८५.२१ TMC (८०.९७ टक्के) पाणीसाठा झाला आहे.
धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होत असून धरणाचा एकूण पाणीसाठा ८५.२१ टीएमसी झाला आहे. सद्यस्थितीत धरण पायथा विद्युत गृहामधून २१०० क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे. तसेच धरण पाणलोट क्षेत्रामधील पर्जन्यमानामध्ये वाढ झाल्यास उद्या दि. १२ रोजी सकाळी १० वाजता कोयना धरणाचे वक्रदरवाजे १ फुट ६ इंच उघडून धरणातून ८ हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात येणार आहे. त्यामुळे कोयना धरणातून नदीपात्रात एकूण १०,१०० क्युसेक विसर्ग सुरू राहणार आहे. त्यामुळे कोयना नदीपात्राजवळील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.