पायऱयावरील भांडणात आमदार महेश शिंदे ठरले वरचढ
प्रतिनिधी/ सातारा
एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत उठाव करत 50 आमदार घेऊन वेगळा बनवला. यामध्येही पुढाकार घेतला तो साताऱयाच्या आमदार शंभूराज देसाईंनीच. त्यांच्याबरोबर आमदार महेश शिंदेही बरोबर होते. त्याचबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही मूळचे सातारा जिल्हय़ातील. पावसाळी अधिवेशनात या अनुषंगाने त्याचे पडसाद उमटणार हे निश्चितच होते. अजितदादांची मंत्री शंभूराज देसाई यांच्याशी तु तू-मै मै झाली. परंतु माघार घेतील ते शंभूराज कसले. उत्कृष्ट संसदपट्टू असलेल्या शंभूराज देसाई यांनी सभागृह गाजवले. तसेच बुधवारी विरोधकांनी पायऱयावर केलेल्या आंदोलनादरम्यान आमदार महेश शिंदे यांनी आपला सातारी बाणा विरोधकांना दाखवला. त्यामुळे या संपूर्ण अधिवेशनात राज्यात साताऱयाची जोरदार चर्चा ऐकायला मिळाली.
प्रथमच साताऱयाच्या आमदारांचे आणि मंत्र्यांचे नाव विधीमंडळाच्या अधिवेशनात गाजत आहे. बंडात महत्वाची भूमिका बजावणाऱया दोन शिलेदारांच्या नावाची चर्चा घडत असल्याने पावसाळी अधिवेशनात साताऱयाचीच हवा झाली आहे. राज्यभरात सातारा जिह्यातील सत्ताधारी असलेल्या मंत्री शंभूराज देसाई यांच्यात व विरोधी पक्ष नेते अजितदादांनी तसेच जितेंद्र आव्हाड यांच्या विधीमंडळात उपस्थित करण्यात आलेल्या अनेक प्रश्नांवरुन घमासान झाले. तोच बुधवारी आमदार महेश शिंदे आणि आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये झालेल्या धक्काबुक्कीने पुन्हा साताऱयाचे नाव चर्चेत आले.
सध्या सर्वसामान्य जनता पिचलेली आहे. पावसामुळे शेतीचे नुकसान झाले आहे. रस्ते खराब झालेले आहेत. टोलला जनता वैतागली आहे. जिह्यातील नगरपालिका निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत, असे अनेक प्रश्न सध्या असताना त्यावर कुठेतरी विधी मंडळाच्या अधिवेशनात चर्चा होईल अशी सातारकरांना आशा होती आणि आहे. मात्र, विधीमंडळाचे अधिवेशन सुरु झाल्यापासून सत्ताधाऱयांपेक्षा विरोधकच आक्रमकपणे सत्ताधाऱयांवर विरोध करु लागल्याचे चित्र आहे. त्यातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सातारा जिल्हा असल्याने सगळय़ांच्या नजरा सातारा जिह्याकडे लागून राहिलेल्या आहेत. बंडामध्ये एकनाथ शिंदेसोबत शेवटपर्यंत राहिलेले उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई आणि कोरेगावचे आमदार महेश शिंदे हे सातत्याने चर्चेत येत आहेत.


राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजितदादा हे बोलताना मध्येच मंत्री शंभूराज देसाई हे बोलल्याने कडक शिस्तीच्या दादांना सहन झाले नाही. परंतु शंभूराज देसाईही मागे हटत नव्हते. त्याची चर्चा विधानभवनापेक्षा पाटण तालुक्यात जास्त झाली. या प्रकारामुळे सातारा चर्चेत राहिला गेला.
तसेच मंगळवारच्या दिवशी देशमुख नावाच्या शेतकऱयाने आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला. सुरुवातीला तो शेतकरी साताऱयाचा असल्याच्या वावडय़ा उठल्या होत्या. परंतु पुन्हा शेतकरी कुठल्या गावचा हे स्पष्ट झाले. त्यानंतर बुधवारी सकाळीच विधानभवनाच्या पायरीवर सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांसमोरासमोर घोषणाबाजी देत आले होते. त्यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे आणि विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांच्यामध्ये जोरदार धक्काबुक्की आणि शिवीगाळ झाली. यामुळे पुन्हा एकदा सातारा चर्चेत आला. यावेळी कोरेगावचे आमदार महेश शिंदे आक्रमक झाले होते. एकुणच या सर्व प्रकरणामुळे पावसाळी अधिवेशन गाजले असले तरी यात मात्र केंद्रस्थानी सातारा जिल्हा आणि साताऱयाचे आमदारच राहिले आहेत.