प्रतिनिधी/ सातारा
जून महिना सुरू झाला तरी अद्यापही मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झालेच नव्हते. गेल्या चार दिवसांपासून तर आज पाऊस येणारच असे वाटत असतानाही पाऊस पडत नव्हता. त्यामुळे उकाडा वाढला होता सातारकरांची घालमेल सुरू होती. त्यामुळे दमदार पावसाची प्रतिक्षा लागून राहिली होती. अखेर बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास वीजांच्या गडगडाटासह पावसाचे आगमन झाले समस्त सातारकर ओलेचिंब झाले. जिल्हय़ातही ठिकठिकाणी पाऊस कोसळला त्यामुळे सर्वत्र चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एकदासा पाऊस पडल्याने अनेकांकडुन समाधान व्यक्त करण्यात येत होते. परंतु या पावसाने काही ठिकाणी झाडे कोसळणे, घराचे पत्र उडून जाणे, वीज पडण्याच्या घटनाही घडल्या आहेत.
मागील काही दिवस केवळ ढगांचा गडगडाटच ऐकावयास मिळत होता. तसेच अनेकदा तर पावसाने केवळ हुलकावणी दिली होती. पण पावसाच्या सरी काही कोसळल्या नव्हत्या. मात्र बुधवारी जोरदार मान्सूनपुर्व पावसाचे आगमन झाले. अचानक आलेल्या या पावसामुळे बाजारपेठेतील फेरी विक्रेते व भाजीपाला विक्रेत्यांचीही चांगलीच तारांबळ उडाली. विक्रीसाठी आणलेल्या आपल्या मालाचे नुकसान होऊ नये याची काळजी या विक्रेत्यांकडून घेण्यात येताना दिसत होती.
शेतकऱयांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले, जिल्हय़ातील जवळपास सर्वच शेतकऱयांची मशागतीची कामे पावसाअभावी खोळंबली होती. त्यामुळे शेतकरी वर्गाकडुन अगदी आतुरतेने पावसाची वाट पाहण्यात येत होती. अखेरीस पावसाचे आगमन झाल्याने आता शेतीच्या पुढील कामांना सुरुवात करण्यात येईल.
सातारकरांची उडाली तारांबळ
अचानक आलेल्या या पावसामुळे सातारकरांची चांगलीच तारांबळ उडाली. कारण अनेकांना आज पाऊस येईल याचा अंदाज नसल्याने छत्री, रेनकोटसारखे कोणतेच पावसाळी साहित्य सोबत घेतले नव्हते. त्यामुळे पावसात भिजतच अनेकांना आपले घर गाठावे लागले होते. तसेच काहींनी तरी पावसापासुन आपले संरक्षण होण्याकरीता मिळेल त्या ठिकाणी आडोसा घेतला होता.
पहिल्या पावसात भिजण्याची मजा
हवामान खात्याचा अंदाज अखेरीस खरा ठरला व पावसाचे दमदार आगमन साताऱयात झाले. अनेक बालचमुंसह मोठय़ांनी ही पहिल्या पावसात भिजण्याचा आनंद ही घेतला. तसेच पालकांनी ही त्यांना पावसात भिजण्याची मजा अनुभवयास दिली.