Satej Patil On Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदे-फडणवीस सरकारने महाविकासआघाडी सरकारमधील अनेक माजी मंत्र्यांची सुरक्षा व्यवस्था काढून घेतली आहे.यावरून आता विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना धारेवर धरले आहे. आज कोल्हापुरात माजी गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी याबाबत आक्षेप नोंदवला आहे.सुरक्षा काढून घेण्यामागे राजकीय रंग असल्याचे त्यांनी म्हटलं आहे.
यावेळी बोलताना ते म्हणाले की, माझी सुरक्षा काढली याबद्दल मला वैयक्तिक आक्षेप नाही. मात्र अजित दादा,नाना पटोले,जयंत पाटील अशा महत्त्वाच्या नेत्यांची सुरक्षा का काढली हे कळलं नाही. काही लोकांची राजकीय दृष्ट्या नाव कमी केली हे दिसते.याला राजकीय रंग दिसतोय.तो नसेल तर त्या पद्धतीचा खुलासा झाला पाहिजे.सुरक्षा काढलेल्या नेत्यांच्या बाबतीत काही घडलं तर त्याची जबाबदारी सरकारने घेतली पाहिजे. भेटून पुन्हा सुरक्षा मागण्यासारखं काही नाही.राज्य सरकारची ती जबाबदारीच असल्य़ाचे त्यांनी म्हटलं आहे.
एअरबस प्रकल्पावरून राम शिंदे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्यजींनी आपल्याच सरकारच्या अपयशाचे खापर आपल्यावर फोडू नये.हिम्मत असेल तर कागदपत्रे दाखवा.नाहीतर खोटे बोललात,या कारणासाठी देशाची माफी मागा अशी मागणी राम शिंदे यांनी केली आहे. यासंदर्भात बोलताना सतेज पाटील म्हणाले, सत्तेत असताना आरोप करण्यापेक्षा चौकशी करावी.आरोप करणं सोपं असतं.बदल्यांची सिस्टीम ठरलेली आहे.कर्तुत्ववान अधिकाऱ्यांनी बदल्या केल्या त्यांच्यावर शंका उपस्थित करताय का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. एअरबसचा फोकस बाजूला होण्यासाठी राम कदम यांनी हे स्टेटमेंट केले आहे. दर दोन तासाने आणि संध्याकाळी नवीन आरोप ते करतात. राज्याच्या दृष्टीने महत्त्वाचे विषय कसे बाजूला जातील हाच एक यांचा अजेंडा आहे, अशी टिकाही त्यांनी केली.