ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राणा दाम्पत्याकडून केलं जात आहे, असा आरोप राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील (satej patil) यांनी केला आहे. तसेच राज्यात कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याचा जो काही प्रकार सुरु आहे, याला भाजप (BJP) जबाबदार आहे, असा आरोपही सतेज पाटील यांनी केलाय.
मातोश्री बाहेर जाऊन हनुमान चालीसा पठण करणार असल्याचा इशारा राणा दाम्पत्याने दिला होता. यावर बोलताना गृहराज्य मंत्री पाटील यांनी राणा दाम्पत्यावर टीका केली. राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचं काम राणा दाम्पत्याकडून केलं जात आहे. जो काही प्रकार सुरु आहे तो चुकीचा आहे. तसेच भाजपकडून राज्यातील वातावरण बिघडवण्याचं काम केलं जातं आहे याचा मी निषेध करतो. तर महाविकास आघाडी सरकार यासारख्या गोष्टींना तोंड देण्यासाठी भक्कम आहे, असेही यावेळी पाटील म्हणाले.
राणा दाम्पत्याचा पोरखेळ
राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडवण्याचा काही लोकांकडून प्रयत्न केला जातोय. पाण्यातून मासा काढल्यावर कसा करतो तशी भाजपच्या लोकांची सत्तेवाचून परिस्थिती झाली आहे, अशी टीका खासदार सुनील ताटकरे यांनी केली आहे. भाजपला सत्तेपासून दूर ठेवल्यामुळे भाजप अशी कट कारस्थाने करत आहे, परंतु त्याचा काहीही उपयोग होणार यानेही. तसेच राणा दाम्पत्य जे काही करत आहेत. तो सर्व पोरखेळ सुरू होता, असं वक्त्यव्यही तटकरेंनी केलं आहे.