प्रशासकीय मान्यतेअभावी रखडले काम, लोकप्रतिनिधींचा पाठपुरावा, पण मनपा प्रशासन सुस्त
सागर पाटील/ कळंबा
कळंबा तलाव (Kalamba Lake) सुशोभीकरणासाठी साडेचार कोटींचा निधी मंजूर झाला आहे . राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत पालकमंत्री सतेज पाटील (Satej Patil) व आमदार ऋतुराज पाटील (Ruturaj Patil) यांच्या प्रयत्नातून या निधीतून कळंबा तलाव परिसराचे सुशोभीकरण होणार आहे .तलावाला निधी मंजूर होऊन तीन महिने झाले. तरी देखील त्याला प्रशासकीय मान्यता मिळाली नसल्यामुळे सदरचे काम लाल फितीत अडकले आहे. त्यामुळे कळंबा तलावाच्या सुशोभीकरणाचे काम सुरू करण्यास मुहूर्त कधी मिळणार? असा प्रश्न कळंबावासीयांकडून उपस्थित केला जात आहे.
लोक प्रतिनिधी प्रशासकीय पातळी वर वेळो वेळी पाठपुरावा करून निधी खेचून आणतात मात्र प्रशासकीय अडथळ्या मुळे कामाला मंजुरी मिळत नाही तर एक ते दीड महिन्यांनी पावसाला सुरुवात होईल तलावाचे काम अद्याप चालू झाले नसल्याने पावसाळ्यात तलावाचे काम चार ते पाच महिने लांबण्याची शक्यता आहे. प्रशासना कडून त्वरित वर्क ऑडर मिळाल्यास कामाची निविदा टेंडर काढणे तसेच प्रशासकीय मान्यता मिळण्या करीत दहा ते पंधरा दिवसाचा कालावधी लागणार असून तलावाचे काम लांबणीवर पडणार आहे.
शहराच्या जवळच असणारा कळंबा तलाव शेजारी वसलेले कळंबा गाव शाळा, महाविद्यालये, वाढणारी लोकवस्ती यामुळे अलीकडच्या काळात कळंबा तलावाचे महत्त्व वाढले आहे. विपुल मत्स्यसंपदा, पक्षांची गर्दी व निसर्गरम्य परिसर यांनी परिपूर्ण असणारा कळंबा तलाव काळाच्या ओघात प्रदूषणाचा बळी ठरला आहे. सांडपाणी, कचरा, कपडे, जनावरे धुने, वाढलेल्या पान वनस्पती यामुळे तलावाला सध्या ओंगळवाणे स्वरुप आले होते. कळंबा तलावाच्या दहा कोटींच्या सुशोभीकरणांतर्गत राज्याच्या निधीतून हाती घेतलेल्या १० कोटींच्या कामातून चार ते पाच वर्षापासून निधी मिळाला नसल्याने सुशोभीकरणाचे काम रखडले होते. तत्कालीन मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रयत्नातून सुशोभीकरणासाठी दहा कोटींचा निधी मंजूर झाला. काही विकासकामे पूर्णत्वाकडे गेली.
ग्रामपंचायत, सामाजिक संघटना, मंडळे आदी घटकांनी श्रमदान करून तलाव प्रदूषण मुक्ती बरोबरच सुशोभीकरणासाठी प्रयत्न केले; पण ते प्रयत्न तोकडे ठरले. परिणामी सुशोभीकरणाच्या कामाला खीळ बसली आहे. दरम्यान, पालकमंत्री सतेज पाटील व आ. ऋतुराज पाटील यांनी तलाव सुशोभीकरण कामासाठी शासन दरबारी पाठपुरावा केल्याने राज्य शासनाच्या प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गतून गत फेब्रुवारी 2022 मध्ये 4कोटी 50 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला. त्यानुसार निधी मंजूर होऊन तीन महिने होत आले; पण तलावाचे प्रशासकीय अधिकाऱ्यानंमुळे काम रखडले असल्याचे चित्र समोर आले आहे.
याबाबत माहिती घेतली असता तलावाच्या कमला प्रशासकीय मान्यता मिळाली नाही निधी मंजूर होऊन तीन महिने झाले तरी लाल फितीच्या कारभार मुळे कमला मुहूर्त लागला नाही सुशोभीकरण प्रक्रियेला खीळ बसली आहे. या संदर्भात शासकीय अधिकारी तसेच पालिका प्रशासनाने गतीने हालचाल करून कळंबा तलाव सुशोभीकरणाच्या कामास गती देण्याची गरज व्यक्त होत आहे.
काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील ग्रामपंचायतीचा हा एक महत्त्वाकांक्षी संकल्प असून शहराच्या सौंदर्यात भर घालू शकेल अशा पद्धतीने कळंबातलावाचे संवर्धन व सुशोभीकरण करण्याचे आराखडाबद्ध नियोजन आहे. सर्वांना सोबत घेऊन पालकमंत्री सतेज पाटील व आ. ऋतुराज पाटील यांच्या कडे पाठपुरावा सुरू असून लवकरच तलावाचे काम मार्गी लागण्यासाठी प्रयत्नशील आहे. – सागर भोगम सरपंच कळंबा.
प्रादेशिक पर्यटन विकास योजनेंतर्गत मिळालेल्या निधीच्या कामाला प्रशासकीय मान्यता अद्याप मिळाली नसून निधी महापालिकेला वर्ग झालेला नाही ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर कामाला सुरुवात करू. – हर्षद घाडगे शहर अभियंता कोल्हापूर महापालिका
पावसामुळे चार महिने काम खोळंबणार…
निधी मंजूर आहे परंतु तीन महिने झाले तरी प्रत्यक्ष काम सुरू नाही पुढील महिन्यात जर ही प्रक्रिया पूर्ण झाली तर जून ते सप्टेंबर काम करता येणार नाही म.न.पा.प्रशासनाने तीन महिने याबाबत प्रक्रिया राबवली नसल्याने पुढील चार ते पाच महिने काम खोळंबण्याचा धोका आहे.