अध्याय पंचविसावा
ईश्वराची भेट घेण्यासाठी त्रिगुणांच्या पलीकडे जावं लागतं. कारण ईश्वर गुणांच्या पलीकडे आहे. प्रत्येक गुणांमुळे माणसाच्या स्वभावामध्ये काही वैशिष्टय़ांचा समावेश होतो. पण म्हणतात ना, आपल्याच तंगडय़ा आपल्या गळय़ात अडकतात. त्यानुसार त्या वैशिष्टय़ांमुळेच मनुष्य त्याच्या अहंकारयुक्त त्रिगुणात्मक स्वभावाच्या पलीकडे जाऊ शकत नाही. माणसाचा अहंकार जर नष्ट होईल तर त्रिगुणांच्या पलीकडे त्याला जाता येईल. हा अहंकार नष्ट करणे कसे शक्मय होईल, हा भगवंतांच्या विवेचनाचा विषय आहे. त्रिगुणांची निर्मिती मायेतून झाली आहे आणि त्यांना मी हा हा म्हणता ओलांडून जाऊ शकेन असे म्हणणाऱयांची बघता बघता अहंकाराने भंबेरी उडवलेली आहे. कारण या त्रिगुणांवर अहंकाराचे शेवाळ चढलेले असते आणि त्यावरून मी मी म्हणणारी माणसे सहजी घसरून पडतात. त्रिगुण आणि अहंकार यांची युती कशी झालेली आहे, हे समजावून सांगण्याच्या आधी भगवंतानी उद्धवाला, सत्व, रज, तम या तिन्ही गुणांची लक्षणे सांगितली. पुढे म्हणाले, आता त्यांचे जे मिश्र लक्षण ते ऐक. तीन गुणांच्यापैकी, एकाएकाच्या अनंत वृत्ती आहेत. त्यामुळेच येथ जीवाला गुणाच्या गुंत्यांत पडावे लागते. ही त्रिगुणांची गुंतागुंत माणसाला स्वतःच्या विचाराने काही सुटत नाही. ही गुंतागुंत जर मनुष्य स्वतःच्या सामर्थ्याने सोडवू शकला असता, तर तो केव्हाच गुणातीत अवस्थेत शिरून ईश्वरस्वरूप झाला असता. आपल्या हातून गुणांच्या तावडीतून सुटका होणं शक्मय नाही हे ज्यांच्या लक्षात आलेलं आहे त्यांना भाग्यवानच म्हणायला हवं! असे लोक सद्गुरु चरणांवर एकनि÷ भाव ठेवतात. मग सद्गुरु सख्ख्या आईच्या मायेने विवेक वैराग्याची फणी घेऊन त्यांची त्रिगुणांची वेणी सोडवितात. गुणांची गुंतागुंत एकदा सोडवली गेली की, ती पुन्हा होण्याची शक्मयता आहे हे गृहीत धरून, ते महामती मुळासह गुण मुंडून त्यांना संन्यासी बनवतात. काही सद्गुरु तर इतके कडक असतात की, ते गुणांची गुंतागुंत सोडवावयाच्या भरीसच पडत नाहीत. ते त्या गुंतागुंतीसकटच त्यांचा नायनाट करतात. स्त्रीच्या केसांचा गुंता सोडवत असताना काही वेळा फणी जरा जोर लावून ओढल्याशिवाय चालतच नाही मग सहाजिकच केसांना ओढ बसून, तिला अतिशय वेदना होतात. त्याप्रमाणे विवेकरूपी फणी सद्गुरु थोडी जोरात ओढू लागले की, जे भावनिकरीत्या जास्त संवेदनशील असतात ते मध्येच उठून पळून जातात. अशा प्रकारचे दुर्बळ लोक दूर पळून जाताना पाहिले, म्हणजे दुसरे किती एकजण मोहरूप अंधारांतच धाव घेतात. तर कोणी केसांची ही गुंतागुंत मस्तकावर तशीच ठेवून त्या गुंतीमध्येच अडकून राहतात. ज्यांची त्यांच्या सद्गुरुंशी भेट झालेली आहे ते सुद्धा वैराग्याच्या गोष्टी सद्गुरुंच्याकडून लागू होऊ लागल्यावर गोंधळून पळून जात असतील तर ज्यांना सद्गुरुंची भेट अजून झालेली नाही त्यांची अवस्था काय होत असेल? ज्यांची गुरुमाउलीची कधी भेटच होत नाही ते कपाळकरंटे असतात, अशी पोरकी पोरे त्रिगुणांपासून उद्भवणारी कोटीच्या कोटी दुःखे भोगत असतात. दोन परार्ध वर्षे आयुष्य असणारा जो ब्रह्मदेव, त्याच्यानेसुद्धा गुणांचे विभाग होत नाहीत. मग गुणांवर मात करण्याचे सामर्थ्य इतरांच्यात कसे असणार? अशा या त्रिगुणांच्या वृत्ती म्हणजे त्यांचे परिणाम इतके गुंतागुंतीचे आहेत की, मीसुद्धा त्यांचे पूर्णपणे वर्णन करू शकत नाही. तीन गुणांच्या अवस्था तुला सांगितल्या. परंतु माणसाच्या स्वभावात सत्व, रज किंवा तम यापैकी कोणता तरी एकच गुण आहे असं कधी होत नाही. कारण प्रत्येकाचा स्वभाव हा त्रिगुणांनी युक्त असाच असतो. तेव्हा या त्रिगुणांचे जेव्हा मिश्रण होते; तेव्हा ते एकमेकांशी असे काही भिडतात की, काही विचारू नकोस. या त्रिगुणांच्या मिश्रित स्थितीला, सन्नीपातवृत्ती असे म्हणतात, ती ऐक. उद्धवा! तीन गुणांच्या मिश्रणानेच “मी’’ आणि “माझे’’ या प्रकारची बुद्धी उत्पन्न होते. मन, शब्दादी विषय, इंद्रिये आणि प्राण यांच्या योगाने वृत्तींचा व्यवहार होतो. यातील गुणसन्नीपाताचा प्रकार असा की, एकाच अहंकाराचे, गुणांच्या संगतीने, सात्विक, राजस आणि तामस असे तीन प्रकार होतात. ज्याच्या स्वभावात जो गुण जास्त प्रमाणात असतो त्या प्रकारचा अहंकार त्याला होतो. त्याचाही विचार ऐक. वेदाज्ञा अवश्य पालन करणे आणि मीच ज्ञानस्वरूप आत्मा आहे असे मानणे, हा अहंकार सात्त्विक होय. मी स्वधर्मकर्मे करणारा, मी स्वर्गादि सुखं भोगणारा, मलाच नानाप्रकारचे सुखविलास प्राप्त होतात, असे समजणे, ह्याचे नांव राजस अहंता होय. मी देहधारी मोठा योद्धा, मीच शत्रूचा संहार करणारा, मी सर्वात अजिंक्मय, असे समजणे हा तामस अहंकार होय.
क्रमशः