वृत्तसंस्था/ बँकॉक
मंगळवारपासून येथे सुरू झालेल्या थायलंड खुल्या सुपर 500 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेतून भारताचे बॅडमिंटनपटू सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी माघार घेतली आहे. प्रकृती नादुरूस्तीमुळे आपण या स्पर्धेत सहभागी होत नसल्याचे सात्विक आणि चिराग यांनी अखिल भारतीय बॅडमिंटन संघटनेला कळविले आहे.
थॉमस चषक बॅडमिंटन स्पर्धेत सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी यांनी पुरूष दुहेरीचा सामना जिंकताना इंडोनेशियाच्या जोडीचा पराभव केला होता. थायलंड खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत किदांबी श्रीकांत, एच.एस. प्रणॉय, बी.साई प्रणित, सौरव वर्मा भारताचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. महिलांच्या विभागात पी.व्ही. सिंधू, सायना नेहवाल सहभागी झाल्या आहेत.