पुणे : भारतीय जनता पक्षात येण्यासंदर्भात सत्यजीत तांबे यांना कोणताही प्रस्ताव भाजपने दिलेला नाही. मात्र, भाजपमध्ये यायचे की नाही, याचा निर्णय त्यांनी घ्यावा, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बानवकुळे (Chandrashekar Bawankule) यांनी पुण्यात पत्रकारांशी बोलताना दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये सत्यजित तांबे यांनी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. महाविकास आघाडीच्या उमेदवार शुभांगी पाटील यांचा सत्यजीत तांबे यांनी पराभव केला. सत्यजीत तांबे यांना भारतीय जनता पक्षाकडून निवडणुकीत स्थानिक पातळीवर मदत करण्यात आली होती. या निवडणुकीनंतर सत्यजीत तांबे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पुण्यात कार्यक्रमासाठी आले असताना भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ही प्रतिक्रिया दिली. नागपूरची जागा भाजपची नव्हती. अमरावतीमध्ये झालेला पराभव स्वीकारला असून पराभवामुळे आत्मचिंतन करावे लागणार आहे. मात्र, विधानपरिषदेच्या निवडणुकीत भाजपचे नुकसान झालेले नाही, असे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.
अधिक वाचा : कसबा, चिंचवड पोटनिवडणूक बिनविरोध होण्यासाठी प्रत्यक्ष चर्चा करणार
नाशिक पदवीधर मतदारसंघातून राजेंद्र विखे पाटील यांना भाजप उमेदवारी देणार होते. मात्र त्यांनी असमर्थता दर्शविली. नाशिकमध्ये तुल्यबळ उमेदवार नसल्याने कोणाला पाठिंबा द्यावा, याचा निर्णय स्थानिक पातळीवर निर्णय घ्यावा, असे धोरण पक्षाने निश्चित केले होते. त्यानुसार स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सत्यजीत तांबे यांना मदत केली. भाजपमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात सत्यजीत तांबे यांना कोणताही प्रस्ताव दिलेला नाही. मात्र भाजपमध्ये यायचे की नाही, याचा निर्णय सत्यजीत तांबे यांनी घ्यावा, असे बावनकुळे यांनी सांगितले.
नागपूरची जागा भाजप कधीच लढत नाही. ती जागा शिक्षक परिषद लढते. भाजपने त्यांना फक्त पाठिंबा दिला होता. यावर विरोधी पक्षाने हुरळून जाऊ नये. अमरावतीचा परभाव मान्य आहे. पराभवाचे आत्मचिंतन केले जाईल. मात्र भाजपने कोकणामध्ये विजय संपादन केला आहे, ही बाब विरोधकांनी लक्षात घ्यावी आणि हुरळून जावू नये, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.