वृत्तसंस्था/ मुंबई
2022 च्या रणजी हंगामातील येथे झालेल्या रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी सौराष्ट्रने बलाढय़ मुंबईवर पहिल्यांदाच निर्णायक विजय नोंदविला. सौराष्ट्रने शुक्रवारी केवळ 7 षटकांच्या खेळात आणि 25 मिनिटांच्या कालावधीत मुंबईला पराभूत करण्याचा विक्रम केला.
शुक्रवारी खेळाच्या चौथ्या दिवशी मुंबईचा तुषार देशपांडे धर्मेंद्रसिंग जडेजाच्या गोलंदाजीवर लाँगऑनवरील चेतन सकारियाकरवी झेलबाद झाला. त्याने 13 धावा केल्या. मुंबईचा फिरकी गोलंदाज मुलानी दोडियाच्या गोलंदाजीवर स्लीपमध्ये झेल देऊन तंबूत परतला. मुलानीने 34 धावा केल्या. मुंबईचा डाव 231 धावात आटोपला. सौराष्ट्रला निर्णायक विजयासाठी केवळ औपचारिकता बाकी होती. सौराष्ट्रने मुंबईचा 48 धावांनी पराभव करत हा निर्णायक विजय मिळविला. बलाढय़ मुंबईने यापूर्वी 41 वेळा रणजी स्पर्धा जिंकली आहे.
अलीकडच्या दोन-तीन वर्षांच्या कालावधीत सौराष्ट्र संघाची राष्ट्रीय स्पर्धांमधील कामगिरी दिवसेंदिवस दर्जेदार होत आहे. रणजी स्पर्धेत मुंबईवर विजय मिळविण्यासाठी ते बरेच दिवसांपासून आतुरलेले होते. दरम्यान, यावषीच्या रणजी हंगामात सौराष्ट्राचे स्वप्न साकार झाले. या सामन्यात सौराष्ट्रचा फिरकी गोलंदाज दोडियाने 129 धावात 8 गडी बाद केले. त्याचे या सामन्यात रणजी पदार्पण होते. राजकोटच्या सौराष्ट्र संघाने 2019-20 च्या रणजी हंगामात रणजी करंडक पटकाविला होता. तसेच त्यांनी याच कालावधीत विजय हजारे करंडकावर आपले नाव कोरले होते.