खोतीगाव येथे प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केलेले मत
प्रतिनिधी /काणकोण
गोव्यातील 2027 च्या विधानसभा निवडणुकीनंतर राज्याचा मुख्यमंत्री आदिवासी समाजातील असेल यासाठी अनुसूचित जमातींना राजकीय आरक्षण मिळण्याची गरज असल्याचे मत माजी मंत्री आणि उटाचे नेते प्रकाश वेळीप यांनी येडा, खोतीगाव येथे आयोजित उटा संघटनेच्या जागृती कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले.
यावेळी व्यासपीठावर कला आणि संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे, दुर्गादास गावडे, पैंगीणच्या जिल्हा पंचायत सदस्या शोभना वेळीप, डॉ. उदय गावकर, विश्वास गावडे, खोतीगावचे माजी सरपंच दया गावकर आणि अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. काही राजकीय लोक आदिवासी नेत्यांचे पाय ओढण्याचे कारस्थान करत आहेत. उटा संघटना ही आदिवासी समाजाचे शस्त्र आहे. समाजात फूट पाडण्याचे काम करणाऱयांची गय केली जाणार नाही, असा इशारा यावेळी प्रकाश वेळीप यांनी दिला.
विधानसभेत आदिवासी समाजाचे सक्रिय नेते असताना आदिवासी कल्याण खाते या समाजातील नेत्याकडे दिले जात नाही. त्यामुळे आदिवासी समाज प्रगतीकडे जाण्याऐवजी त्याला मागे खेचले जात आहे, असा आरोप गोमंतक गौड मराठा समाजाचे अध्यक्ष विश्वास गावडे यांनी केला. यावेळी मंत्री गोविंद गावडे, डॉ. उदय गावकर, दुर्गादास गावडे यांनी आपल्या भाषणात आदिवासी समाजाला कोणतीही गोष्ट किंवा अधिकार मागून मिळालेले नसून त्यासाठी संघर्ष करावा लागलेला आहे, याकडे लक्ष वेधले. अर्जुन गावकर यांनी स्वागत केले, तर दया गावकर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तसेच आभार मानले.