‘उड चलो’ने राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेला दिली गती,
प्रतिनिधी/ सातारा
भारतातील संरक्षण दलांना आणि त्यांच्यावर अवलंबून असलेल्यांना सेवा देणाऱया उड चलो या अग्रगण्य कन्झ्युमर-टेक स्टार्ट-अप कंपनीने, साताऱयातील सैनिक स्कूलमधील 7 विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती जाहीर केली आहे. भारतीय संरक्षण दले ही राष्ट्राच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतात, त्यांच्या या कार्यास गती देण्याच्या व राष्ट्र निर्माण प्रक्रियेला आणखी मदत करण्याच्या उद्देशाने, उड चलोने प्रत्येक इयत्तेतील एका विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती दिली आहे. भविष्यात सशस्त्र दलात सामील होण्याची इच्छा बाळगणाऱया; परंतू आर्थिक परिस्थितीमुळे ही इच्छा फलद्रूप होणे कठीण असणाऱया विद्यार्थ्यांसाठी समान संधी निर्माण करण्याकरीता आणि त्यांना आर्थिक तणावातून मुक्त करण्याकरीता ही शिष्यवृत्ती देण्यात येत आहे.
सैनिकी शाळांमध्ये अनेकदा दुर्गम खेडी आणि लहान शहरांमधून विद्यार्थी येतात. हे विद्यार्थी सहसा दुर्बल आर्थिक पार्श्वभूमीचे असतात. त्यांच्या कुटुंबांना सैनिक शाळांद्वारे आकारले जाणारे किमान वार्षिक शुल्क भरण्यासही त्रास होत असतो. आर्थिक आव्हानांमुळे असे अनेक हुशार विद्यार्थी शिक्षण सोडतात किंवा आपले शिक्षणच बंद करतात. उडचलो च्या शिष्यवृत्ती योजनेमध्ये प्रत्येक इयत्तेतील अशा पात्र विद्यार्थ्यांची निवड शाळेतील अधिकाऱयांच्या सहकार्याने करण्यात येते आणि त्यांना आर्थिक मदत करण्यात येते; जेणेकरून हे विद्यार्थी अखंडपणे आपले शिक्षण पूर्ण करू शकतील.
सैनिकांच्या जीवनात सोपेपणा आणणे या आपल्या ब्रीदवाक्यासाठी उडचलो कटिबद्ध आहे. या शिष्यवृत्ती उपक्रमाद्वारे, उडचलो कंपनीने या विद्यार्थ्यांना सक्रियपणे अर्थसाह्य देण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे; जेणेकरून त्यांच्या शिक्षणात कोणतेही अडथळे येणार नाहीत. सध्या उडचलोने या उपक्रमासाठी दोन सैनिकी शाळांसोबत करार केला आहे आणि आगामी काळात उपक्रमाचा विस्तार करण्याची कंपनीची योजना आहे.
उडचलो चे संस्थापक व मुख्य कार्यकारी अधिकारी रवी कुमार म्हणाले, सशस्त्र दलासाठी सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे मनुष्यबळ विकसित करणे आणि कोणत्याही संकटावर मात करण्याच्या दृष्टीने या विद्यार्थ्यांना विविध प्रकारचे प्रशिक्षण देऊन सुसज्ज करणे हे काम आपल्या सैनिकी शाळा अतिशय उत्तम प्रकारे करीत आहेत; उडचलोच्या शिष्यवृत्ती उपक्रमामुळे हे सर्वोत्कृष्ट गुणवत्तेचे विद्यार्थी आपले शिक्षण पूर्ण करू शकतात. या उपक्रमाच्या माध्यमातून भविष्यात देशासाठी एक बलदंड सैनिकांची फळी तयार होईल, असा आम्हाला विश्वास वाटतो.
उडचलो च्या लष्करी कामकाज विभागाचे प्रमुख कर्नल डी. बी. टिंगरे म्हणाले, भारतातील या वंचित भागातील तरुणांना सशस्त्र दलांमध्ये सहजी प्रवेश मिळत नाही. उडचलोच्या उपक्रमामुळे या प्रतिभावान मुलांना शिकण्याचे बळ मिळते, तसेच आपल्या सशस्त्र दलांमध्ये आणि त्यायोगे राष्ट्रउभारणीच्या कार्यामध्ये सहभागी होण्याची संधीही मिळते. सातारा सैनिकी शाळेतील उत्कृष्ट विद्यार्थी आम्ही यंदा निवडले आहेत आणि दरवर्षी असे गुणवंत विद्यार्थी अधिकाधिक संख्येने आम्ही निवडत राहू.
या शिष्यवृत्ती योजनेसाठी विद्यार्थ्यांची निवड करण्याकरीता उडचलो ने सातारा सैनिक स्कूल आणि पश्चिम बंगालमधील पुरुलिया सैनिक स्कूल यांच्याशी करार केला आहे. 2020 मध्ये सुरू झालेल्या योजनेच्या माध्यमातून उडचलोने आजपर्यंत 21 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली आहे.