पुणे / प्रतिनिधी :
Scholarship Exam Result Announced महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता पाचवी व आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेचा अंतरिम निकाल सोमवारी रात्री उशिरा जाहीर झाला. इयत्ता पाचवीचा निकाल 23.90 टक्के, तर आठवीचा निकाल 12.54 टक्के लागला आहे. पाचवीच्या शिष्यवृत्तीसाठी 91 हजार 470 विद्यार्थी पात्र ठरले आहेत. तर आठवीच्या शिष्यवृत्तीसाठी 35 हजार 34 विद्यार्थी पात्र ठरले असल्याची माहिती परीक्षा परिषदेच्या सहायक आयुक्त स्मिता गौड यांनी मंगळवारी दिली. गतवर्षीच्या तुलनेत पाचवी व आठवीच्या निकालात वाढ झाली आहे.
परीक्षा परिषदेकडून 31 जुलै रोजी राज्यभरात ही परीक्षा घेण्यात आली होती. पाचवीसाठी 4 लाख 18 हजार 55 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यापैकी 3 लाख 82 हजार 697 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. तसेच 35 हजार 358 विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थित होते. एकूण 91 हजार 470 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. तर 2 लाख 91 हजार 227 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी अपात्र ठरले आहेत. पाचवीचा एकूण निकाल 23.90 टक्के लागला आहे.
इयत्ता आठवीसाठी 3 लाख 3 हजार 819 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. यांपैकी 2 लाख 79 हजार 466 विद्यार्थी उपस्थित होते. तर 24 हजार 353 विद्यार्थी अनुपस्थित होते. एकूण 35 हजार 34 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहेत. एकूण 2 लाख 44 हजार 432 विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. पात्रतेची एकूण टक्केवारी 12.54 इतकी आहे. गतवर्षीच्या तुलनेत निकालात यंदा वाढ झाली आहे. गेल्या वर्षी पाचवीचा निकाल 16.99 टक्के, तर आठवीचा निकाल 11.39 टक्के लागला होता.
अधिक वाचा : हिमाचल प्रदेशात काँग्रेसला खिंडार; 26 बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
दरम्यान, शाळांना विद्यार्थ्यांचा निकाल आपल्या लॉगिनमधून तसेच पालकांना त्यांच्या पाल्यांचा निकाल संकेतस्थळावर बघता येणार आहे. विद्यार्थ्यांना गुणपडताळणी करून घेण्यासाठी तसेच विद्यार्थ्याचे नाव, आडनाव, वडिलांचे नाव, आईचे नाव, शहरी किंवा ग्रामीण, अभ्यासक्रम इत्यादीमध्ये दुरुस्तीसाठी संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये 17 नोव्हेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहेत. गुणपडताळणीसाठी प्रत्येक पेपरकरिता 50 रुपये याप्रमाणे शुल्काची रक्कम ऑनलाइन पेमेंटद्वारे भरावी लागेल. यासाठी केवळ ऑनलाइन अर्जच करावेत. विहित मुदतीनंतर प्राप्त झालेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी.
विहित मुदतीत आवश्यक शुल्कासह ऑनलाइन प्राप्त अर्जानुसार गुणपडताळणीचा निर्णय संबंधित शाळेच्या लॉगिनमध्ये अर्ज प्राप्त झाल्यानंतर 30 दिवसांपर्यंत कळविण्यात येईल. गुणपडताळणीसाठी आलेले अर्ज निकाली काढल्यानंतर अंतिम निकाल व गुणवत्ता यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, अशी माहिती गौड यांनी दिली.