शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांचा इशारा; ऊस दरासंदर्भात लवकरच बैठकीत तोडगा काढू
कोल्हापूर प्रतिनिधी
वीस पटाच्या आतील शाळा राज्य सरकारकडून बंद करण्यात येणार नाहीत. तसा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. परंतु शाळा बंद करण्यासंदर्भात अफवा पसरवून लोकांची दिशाभूल केली जात आहे. त्यामुळे अफवा पसरविणार्यांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे शालेय शिक्षण मंत्री व जिह्याचे पालकमंत्री दीपक केसरकर यांनी मंगळवारी पत्रकारांशी बोलताना दिला. तसेच ऊस दरासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिलेल्या आंदोलनाच्या इशार्याच्या पार्श्वभूमीवर लवकरच बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असेही त्यांनी सांगितले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीनंतर त्यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला.
मंत्री केसरकर म्हणाले, वीस पटसंख्येच्या आतील शाळा बंद करण्याचा कोणताही निर्णय सरकारने घेतलेला नाही. परंतु अशा अफवा काही संघटनांकडून पसविल्या जात आहेत. तसे संदेश सोशलमिडीयाच्या माध्यमातून प्रसारीत केले जात आहेत. तसेच जाणीवपूर्वक प्रसारमाध्यमांकडेही अशा पध्दतीने चुकीचे संदेश पाठविले जात आहेत. अशा लोकांचा शोध घेऊन त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल.
ऊस दरासंदर्भात माजी खासदार राजू शेट्टी यांनी आंदोलनाचा इशारा दिला आहे, याबाबत मंत्री केसरकर यांना विचारले असता ते म्हणाले, ऊस दरासंदर्भात माजी खासदार शेट्टी यांच्यासह सर्व शेतकरी संघटनांचे प्रतिनिधी, साखर कारखान्यांचे प्रतिनिधी व संबंधित विभागांचे अधिकारी यांच्यासोबत लवकरच बैठक घेऊन दराबाबत तोडगा काढला जाईल. यावेळी बाळासाहेबांची शिवसेनेचे जिल्हाप्रमुख रवींद्र माने, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल ढवण आदी उपस्थित होते.