विद्यार्थी, शिक्षक, पालक चिंतेत
प्रतिनिधी /मडगाव
शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन 15 दिवस उलटले तरी विद्यार्थ्यांना पाठय़पुस्तके उलपब्ध झालेली नाहीत. गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्याने पाठय़पुस्तकांची समस्या निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे. 1 ली ते 8वी पर्यंतची पाठय़पुस्तके ही शिक्षण खात्याकडून पुरविली जातात तर 9 ते 12 पर्यंतची पुस्तके विद्यार्थ्यांना पुस्तक विक्रेत्यांकडून विकत घ्यावी लागतात.
1 ली ते 8वी पर्यंतची पाठय़पुस्तके समग्र शिक्षा अभियान अंतर्गत विद्यार्थ्यांना पुरविली जातात. मात्र, यंदा ही पाठय़पुस्तके वेळीच उलपब्ध झालेली नाहीत. अवघीच काही पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचली असून बरीच पुस्तके अद्याप विद्यार्थ्यांपर्यंत पोचलेली नाहीत. ही पुस्तके नेमकी कधी उलपब्ध होतील याची ठोस माहिती कुणीच देऊ शकत नाही.
कोरोनामुळे वेळापत्रक कोलमडले
गेली काही वर्षे 1ली ते 8वी पर्यंतची पाठय़पुस्तके मुलांना शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होऊन आठवडा भरात उपलब्ध होत असे. मात्र, गेली दोन वर्षे कोरोना महामारीत गेल्याने संपूर्ण वेळापत्रकच कोलमडले व त्याचा परिणाम पाठय़पुस्तकांवर देखील झालेला आहे. गेली दोन वर्षे विद्यार्थ्यांनी एकमेकांकडील पाठय़पुस्तके वापरून आपले शैक्षणिक वर्ष पूर्ण केले. त्यात वर्गदेखील ऑन लाईन असल्याने शिक्षकांनी पाठय़पुस्तकांचा विषय तसा गांभीर्याने घेतला नव्हता.
आपली पुस्तके दुसऱयांना देण्याचा प्रयत्न
सध्या अवघीच पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांपर्यंत पोचली असली तरी उर्वरित पाठय़पुस्तके लवकर मिळावी यासाठी काही शाळांच्या मुख्याध्यापकांनी शिक्षण खात्याकडे विचारपूस करण्यास सुरवात केली आहे. बऱयाच शाळांनी-हायस्कुलांनी विद्यार्थ्यांना एकमेकांची पाठय़पुस्तके वापरण्यास सांगितले आहे. 1 ली तून दुसरीत गेलेल्या विद्यार्थ्यांने आपली पुस्तके पहिलीच्या वर्गातील विद्यार्थ्यांला दिलेली आहे. असा हा प्रकार 8वीच्या वर्गात झालेला आहे. मात्र, ज्या विद्यार्थ्यांना पुस्तकेच उपलब्ध झालेली नाहीत, त्याची प्रचंड गैरसोय झालेली आहे.
9 वी , 11वी ची पुस्तकेच उपलब्ध नाहीत
सध्या 9वी ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना पुस्तक विक्रेत्यांकडून पुस्तके खरेदी करावी लागतात. मात्र 9वी व 11वीची पाठय़पुस्तके अजिबात उलपब्ध नसल्याची माहिती मडगावचे एक पुस्तक विक्रेते सुदेश तुळशीदास मळकर्णेकर यांनी दिली. अशीच माहिती मडगावातील अन्य एका विक्रेत्याने दिली.
दहावी व बारावीची पाठय़पुस्तके विद्यार्थ्यांना बऱयापैकी उपलब्ध झालेली आहे. कारण, विद्यार्थी 10वी व 12वीची पाठय़पुस्तके मिळविण्यासाठी अगोदरच प्रयत्न करीत असतात. त्यात बारावीचे वर्ग हे अगोदरच सुरू होतात तसेच टय़ुशन वर्ग देखील. म्हणून विद्यार्थ्यांची गैरसोय होत नाही, असे मत मळकर्णेकर यांनी व्यक्त केले.
पुस्तकांचा घोळ लवकर संपण्याची शक्यता कमी
11वीची इंग्रजी व इकॉनोमिक्स (भाग-1) विषय सोडला तर अन्य कोणतीच पुस्तके उपलब्ध नाहीत. अन्य पुस्तके उपलब्ध होतील की नाही हे देखील विक्रेत्यांना ठाऊक नाही. मुळात राज्यात किती पाठय़पुस्तके लागणार याची कल्पनाच पब्लिशरला देण्यात आलेली नाही. त्यामुळे पाठय़पुस्तकांचे प्रकाशन करण्यात आलेले नाही, अशी माहिती हाती आली आहे. आता पुस्तकांची ऑर्डर दिली तरी ही पुस्तके कधी मिळणार हे सांगणे कठीण आहे. त्यात पाठय़पुस्तकांच्या छपाईसाठी लागणाऱया पेपरचा दर वाढलेला आहे. त्यामुळे जुन्या दराने पाठय़पुस्तके पुरविणे पब्लिशरला शक्य होणार नाही. त्यामुळे पाठय़पुस्तकांचा घोळ लवकर संपण्याची शक्यता कमीच आहे
9 वीची हिस्ट्री व जॉग्राफी ही पुस्तके महाराष्टात सेठ पब्लिशरकडून पुरविली जातात तर उर्वरित पुस्तके दिल्लीतील होली फेथे पब्लिशरकडून पुरविली जातात. दिल्लीवरून पुस्तके मागविण्यात आली तरी ती गोव्यात पोचण्यासाठी किमान आठ-दहा दिवस लागू शकतात. जर पुस्तके पब्लिशरकडे उलपब्ध असेल तरच ती मिळू शकतील. अन्यथा पुस्तकांसाठी विद्यार्थ्यांना संघर्ष करावा लागणार आहे. पुस्तक छपाईचे कंत्राट गोव्यातील एका पब्लिशरला दिल्यास ते विद्यार्थी व शिक्षकांच्या हिताचे ठरेल असे मत देखील शिक्षकांकडून व्यक्त होत आहे.