मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचा निर्णय ‘; शिक्षण संचालक झिंगडे यांना दिला आदेश
पणजी ; राज्यातील तापमान वाढतच असून त्याचा परिणाम विद्यार्थ्यांवर होऊ शकतो, यांची मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दखल घेऊन बुधवारी रात्री उशिरा पहिलीपासून बारावीपर्यंतचे वर्ग दुपारी बारापर्यंतच घेण्याचा निर्णय घेतला. त्यासंबंधीचा रितसर आदेश जारी करुन तो सर्व विद्यालयांना कळवा, असा आदेश मुख्यमंत्र्यांनी शिक्षण संचालकांना दिला. त्यामुळे आज गुरुवारी, उद्या शुक्रवारी या इयत्तांचे वर्ग दुपारी 12 वाजेपर्यंतच चालतील. मुख्यमंत्री म्हणाले की विद्यार्थ्यांवर वाढत्या तापमानाचा वाईट परिणाम होऊ नये म्हणून आज-उद्या ही उपाययोजना करण्यात येईल. त्यानंतरच्या तापमानाची परिस्थिती पाहून पुढील निर्णय घेण्यात येईल आणि तो संबंधितांना कळविण्यात येईल.
राज्यातील तापमान वाढतेच
राज्यातील पारा सरासरीच्या तुलनेत 6 डि.से. ने वाढला असून पणजीत बुधवारी तापमान 38.4 डि.से. एवढे झाले. मुरगावात तापमान 37.8 डि.से. एवढे वाढले. अनेक वर्षांनंतर तापमानाने उच्चांकी पातळी गाठली असून 12 मार्चपर्यंत सरासरीपेक्षा 4 ते 6 डि.से.पर्यंत पारा अधिक वाढण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे आणि जनतेला सावधानतेचा इशारा दिला आहे.
बुधवारी तापमानाने गाठला उच्चांक
राज्यातील तापमान खाली उतरण्याचे नाव घेत नाही. आतापर्यंत गोव्यात अनेकवेळा तापमान वाढले होते. मात्र ते 5 ते 6 दिवसांकरिता वाढत होते. यंदा प्रथमच गेले 3 आठवडे तापमान 35 डि.से. व त्यापेक्षाही पुढे गेलेले आहे. बुधवारी तापमानाने यंदाचा उच्चांक गाठलाला आणि 39 डि.से.च्या आत पोहोचलेला आहे. वाढत्या उष्णतेबरोबरच हवेतील आद्रतादेखील कमी होत असून याचे दुष्परिणाम आरोग्यावर होण्याची शक्यता आहे. भरदिवसा दु. 12 वा. पासून दु. 3 वाजेपर्यंत पारा 27 डि.से.च्याही पुढे जात असल्याने याच दरम्यान फिरण्याचे टाळले पाहिजे.
बारा वाजेपर्यंतच शाळा ठेवणे आवश्यक
हवामान खात्याने सायंकाळी जारी केलेल्या सूचनेनुसार तापमानाचे वाढते प्रमाण दि. 12 मार्चपर्यंत तसेच राहण्याची शक्यता आहे. सरासरी तापमानाच्या तुलनेत 4 ते 6 डि.से.नी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यातच हवेतील आद्रतेचे प्रमाणही घटत असल्याने त्याची झळ शाळकरी मुलांना बसण्याची शक्यता असल्याने शाळांच्या वेळापत्रकात बदल करणे आवश्यक होते. दु. 12 च्या आत मुले घरात परतण्याची आवश्यकता आहे, म्हणून मुख्यमंत्र्यांनी तातडीने वरील निर्णय घेतला.
दुपारी उन्हात फिरू नका, ही तर उष्णतेची लाट
हवामान खात्याने गोव्यात ही उष्णतेची लाट आहे, असे म्हटले आहे. सर्वांनी आरोग्याची काळजी घ्यावी, असा सल्ला दिला आहे. यापूर्वी इ.स. 2013 मध्ये दि. 3 मार्च रोजी तापमान 38.7 डि.से. एवढे झाले होते. बुधवारी पारा बराच वाढला होता. मात्र त्याचवेळी वाराही सुरू झाल्याने तापमानाची झळ लक्षात आली नाही. तथापि, वाढत्या तापमानाबरोबरच हवेतील आद्रतेचे प्रमाण 22 टक्क्यांनी कमी झाले असून सायं. 5.30 वा ते 57 टक्केपर्यंत पोहोचले होते. ही परिस्थिती थोडी गंभीरच आहे. दुपारी 12 नंतर नागरिकांनी वाहनांवरून फिरणे टाळण्याची गरज आहे. उष्णतेचे अनेक विकार वा परिणाम होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे.