संसदेत भाजपवर चढविला शाब्दिक हल्ला
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
कनौजचे सप खासदार अखिलेश यादव यांनी लोकसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेत भाग घेता. यादरम्यान त्यांनी भाजप सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. अखिलेश यादव यांनी नरेंद्र मोदी आणि योगी आदित्यनाथ यांच्या सरकारला लक्ष्य करत उत्तरप्रदेशात विकासकामे केली असती तर राज्यात भाजपच्या जागा कमी झाल्या नसत्या असे म्हटले आहे.
10 वर्षांममध्ये आमचे राज्य जेथे होते तेथेच आहे. उत्तरप्रदेशात काहीच प्रभावी कार्य करण्यात आलेले नाही. भाजपने जर खरोखरच विकास केला असता तर निवडणुकीचा निकाल त्यांच्या विरोधात गेला नसता. उत्तरप्रदेशात भाजप केवळ पराभूत झाला नसून त्याच्या जागा कमी झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदीही फार मोठ्या मताधिक्यांनी विजयी झालेले नाहीत असे अखिलेश यादव यांनी म्हटले आहे.
या सरकारचे हा सलग 11 वा अर्थसंकल्प आहे. या अर्थसंकल्पानंतरही अपेक्षाभंगच दिसून येत आहे. सरकारमध्ये असूनही भाजप नेत्यांच्या आनंद दिसून येत नाही. या अर्थसंकल्पात बेरोजगार, युवांसाठी, ग्रामीण भागांसाठी फार काही तरतूद नाही. महागाईला तोंड देण्याची कसरत केवळ परिवार असलेल्या लोकांना करावी लागत असल्याची खोचक टिप्पणी अखिलेश यांनी भाजप नेत्यांना उद्देशून केली आहे.
उत्तरप्रदेश सारख्या मोठ्या राज्यातून सर्वाधिक खासदार निवडले जातात. परंतु या अर्थसंकल्पात आमच्या राज्याला कुठलाच मोठा प्रकल्प मिळालेला नाही. पंतप्रधान मिळाले, परंतु एखादा मोठा प्रकल्प मिळाला नाही, 10 वषांमध्ये आयआयएम, आयआयटी काहीच मिळाले नसल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली.
जनकपूर ते अयोध्यापर्यंत द्रुतगती मार्ग निर्माण करण्याची मागणी मी केली होती, त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणात एफडीआय येत असल्याचे भाजप सरकार सांगते, परंतु समाजवादी पक्षाचे राज्यात सरकार असताना नोएडामध्ये राबविलेल्या धोरणाच्या अंतर्गत अनेक कंपन्यांनी स्वत:चे प्रकल्प उभारले आहेत. आमच्या शासनकाळात या कंपन्यांना भूखंड देण्यात आले होते असा दावा अखिलेश यादव यांनी केला आहे.