वृत्तसंस्था/ प्रिटोरिया
दक्षिण आफ्रिकेत सध्या 19 वर्षाखालील वयोगटाची महिलांची टी-20 क्रिकेट स्पर्धा खेळविली जात आहे. या स्पर्धेत गुरुवारी भारत आणि यजमान दक्षिण आफ्रिका यांच्यात सामना आयोजित केला होता. पण अचानक पावसामुळे तसेच मैदान आणि खेळपट्टी ओलसर राहिल्याने हा सामना पंचांनी रद्द म्हणून घोषित केला. या सामन्यामध्ये एकही चेंडू टाकला गेला नाही.
या सामन्याच्या सुरुवातीला किरकोळ पाऊस झाल्याने मैदान ओलसर झाले होते. पंचांनी नाणेफेकीला विलंब केला. दरम्यान, पुन्हा पावसाचे आगमन झाल्याने पंचांनी किमान तीनवेळा मैदानाची पाहणी केली आणि त्यांनी हा सामना खेळणे अशक्मय असल्याचे घोषित केले. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात पाच सामन्यांची ही मालिका खेळविली जात आहे. भारताने या मालिकेतील 27 डिसेंबर रोजी झालेल्या पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 54 धावांनी पराभव करून आघाडी मिळविली आहे. या मालिकेतील तिसरा सामना प्रिटोरियामध्ये 1 जानेवारीला खेळविला जाणार आहे. दक्षिण आफ्रिकेत 14 जानेवारीपासून आयसीसीची महिलांची टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धा सुरू होणार असून यामध्ये एकूण 12 संघांचा समावेश आहे. भारतीय संघाला या स्पर्धेत थेट प्रवेश देण्यात आला आहे.