नवी दिल्ली / वृत्तसंस्था
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळावे, या मागणीला रशियाने पाठिंबा दिला आहे. भारताकडे आंतरराष्ट्रीय व्यवहारांचा मोठा अनुभव आहे. त्यामुळे भारत या पदासाठी अत्यंत योग्य आणि पात्र देश आहे. म्हणून भारताला हे स्थायी सदस्यत्व मिळावे, असे प्रतिपादन रशियाने केले आहे.
काही दिवसांपूर्वी रशियाची राजधानी मॉस्को येथे प्रिमाकोव्ह रिडींग्ज इंटरनॅशनल फोरम या संस्थेच्या वतीने एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात बोलताना रशियाचे विदेश व्यवहार मंत्री सर्गेई लाव्हरोव्ह यांनी हा पाठिंबा व्यक्त केला. भारताप्रमाणेच ब्राझील, जपान, जर्मनी आणि एका आफ्रिकन देशाला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व मिळण्याची आवश्यकता आहे. यामुळे सुरक्षा परिषदेला समतोल स्वरुप प्राप्त होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले.
भारताला जागतिक नेतृत्व द्या
भारताचा आर्थिक विकास दर उत्तम आहे. भारताची आर्थिक प्रगतीही मोठी आहे. त्यामुळे या देशाला जागतिक नेतृत्व दिले पाहिजे. आर्थिक क्षेत्रात जगाचे नेतृत्व करण्याची भारताची क्षमता आहे. भारताची लोकसंख्याही लवकरच इतर कोणत्याही देशापेक्षा अधिक होईल. त्यामुळे भारत हा मानवबळाच्या दृष्टीने समृद्ध आहे. त्यामुळे भविष्यकाळातही त्याचा आर्थिक विकास वेगाने होऊ शकतो. या सर्व बाबी लक्षात घेऊन भारताला सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या दृष्टीने गांभीर्याने विचार होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन त्यांनी केले.
सध्या पाच स्थायी देश
सध्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेत अमेरिका, रशिया, ब्रिटन, फ्रान्स आणि चीन असे पाच देश आहेत. सुरक्षा परिषद ही जगातील सर्वात महत्त्वाची संस्था आहे. या संस्थेच्या हातातच जगाचा राजकीय भूगोल आणि राजकारण असते. त्यामुळे अनेक देश स्थायी सदस्य बनण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
काय अडचण आहे ?
सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व भारताला मिळण्यास चीनचा अडथळा आहे. सुरक्षा परिषदेत नव्या देशाचा सदस्य म्हणून समावेश करायचा असेल तर या परिषदेच्या सर्व पाच स्थायी सदस्यदेशांची मान्यता आवश्यक आहे. एका देशाने जरी नकार दिला तरी हा प्रवेश होऊ शकत नाही. त्यामुळे चीनने पाठिंबा दिला नाही तर भारताचा प्रवेश होऊ शकत नाही. चीन वगळता अन्य चारही स्थायी सदस्य असणाऱया देशांनी भारताला पाठिंबा दिलेला असूनही त्याचा उपयोग नाही.