सलग तिसऱया दिवशी दहशतवाद्यांकडून कुरापती
श्रीनगर / वृत्तसंस्था
स्वातंत्र्यदिन सोहळा केवळ दोन-तीन दिवसांवर आला असताना जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांचे कारनामे वाढले आहेत. गेल्या तीन दिवसांपासून येथे सलग हल्लासत्र आणि चकमक सुरू आहे. दुसरीकडे, बांदीपोरा येथे अज्ञात हल्लेखोरांनी एका बिहारी कामगाराची हत्या केल्यानंतर तणाव वाढला आहे. या वाढत्या हल्ल्यांमुळे सुरक्षा यंत्रणेसमोर दहशतवादी कारनामे रोखण्याचे आव्हान निर्माण झाले आहे.
अनंतनागच्या बिजबेहारामध्ये शुक्रवारी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात एक पोलीस अधिकारी जखमी झाला. गुलाम कादिर असे जखमीचे नाव असून तो एसपीओ म्हणून तैनात होता. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. या हल्ल्यानंतर सुरक्षा दलाच्या संयुक्त पथकाने शोधमोहीम सुरू केली आहे. सायंकाळपर्यंत संशयित हल्लेखोर सुरक्षा यंत्रणांना सापडले नव्हते. तथापि, या हल्ल्यानंतर परिसरातील फौजफाटा वाढविण्यात आला आहे. यापूर्वी गुरुवारीच राजौरीमध्ये लष्करी छावणीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न सुरक्षा यंत्रणांनी उधळून लावत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला होता. तर, बुधवारी बडगाममध्ये एका चकमकीत तीन दहशतवाद्यांना यमसदनी पाठविण्यात आले होते.