राहुल गांधी यांचे अग्निपथ योजनेवर टीकास्त्र
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सैन्य भरती योजना ‘अग्निपथ’वरून केंद्र सरकारवर पुन्हा निशाणा साधला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या ‘प्रयोगशाळे’च्या या ‘नव्या प्रयोगा’मुळे देशाची सुरक्षा आणि तरुणाईचे भविष्य धोक्यात आल्याचे राहुल यांनी म्हटले आहे. 60,000 सैनिक दरवर्षी सेवानिवृत्त होतात आणि यातील केवळ 3 हजार जणांना सरकारी नोकरी मिळत आहे. 4 वर्षांच्या कंत्राटानंतर हजारोंचय संख्येत सेवानिवृत्त होणाऱया अग्निवीरांचे भवितव्य काय असेल असे प्रश्नार्थक विधान त्यांनी ट्विट करत केले आहे.
अग्निपथ योजनेच्या अंतर्गत तरुण-तरुणींना केवळ 4 वर्षांसाठी सैन्यात भरती करण्याची तरतूद आहे. यातील 25 टक्के उमेदवार आणखी 15 वर्षांसाठी सैन्यात कार्यरत राहणार आहेत. या योजनेच्या घोषणेनंतर देशातील अनेक भागांमध्ये हिंसक निदर्शने झाली होती. विशेषकरून बिहारमध्ये निदर्शनांनी उग्र रुप धारण केले होते. परंतु आता या योजनेच्या अंतर्गत सैन्य भरती प्रक्रियेने वेग पकडला आहे.