न्यायालयाने फटकारल्यानंतर भगवंत मान सरकारने बदलला निर्णय
चंदिगढ / वृत्तसंस्था
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणानंतर पंजाब सरकारने 424 व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयावर यू-टर्न घेतला आहे. पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर भगवंत मान सरकारने व्हीव्हीआयपींची सुरक्षा बहाल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरक्षा मागणाऱयांची यादी लीक केल्याप्रकरणी न्यायालयाने पंजाब सरकारला फटकारले होते. त्यानंतर सरकारने सर्व 424 व्हीव्हीआयपींची सुरक्षा बहाल करण्याचे आदेश दिले. ज्या व्हीव्हीआयपींची सुरक्षा काढून टाकण्यात आली ती मर्यादित काळासाठी होती, असे न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान पंजाब सरकारने स्पष्ट केले. तत्पूर्वी, कोणाचीही सुरक्षा हटवायची असेल, तर त्याचा योग्य आढावा घेतला पाहिजे, तरच असा निर्णय घ्यावा, असे न्यायालयाने पंजाब सरकारला सांगितले होते.
सिद्धूच्या हत्येनंतर त्याच्या वडिलांनीही मुख्यमंत्री भगवंत मान यांना पत्र लिहिले होते. त्यांनी पत्रात सिद्धूची सुरक्षा हटवण्यावर प्रश्न उपस्थित केले होते. तशंज्ह सिद्धूच्या हत्या प्रकरणाची न्यायाधीशांमार्फत चौकशी करावी, असे म्हटले होते. काही दिवसांपूर्वी राज्य सरकारने या व्हीव्हीआयपींच्या सुरक्षेत कपात केली होती. यामध्ये गायक आणि काँग्रेस नेते सिद्धू मुसेवाला यांचा समावेश होता. सुरक्षा काढून घेतल्यानंतर काही दिवसांनी मुसेवाला मारला गेला. यानंतर पंजाब सरकारला चांगलाच फटका बसला. या हत्याकांडावरून आप सरकारवर जोरदार टीका झाली होती.