विविधतेत एकता हे भारताचे आणि भारतीय संस्कृतीचे प्रमुख वैशिष्टय़ मानले जाते. येथील सणउत्सव म्हणजे या एकत्वाचेच प्रतीक असून, या माध्यमातून समाजातील सर्व घटक एकत्र येत असतात. किंबहुना, कोरोना स्थितीच्या पार्श्वभूमीवर निर्बंध लावण्यात आल्याने सर्व धर्मियांना आपले उत्सव मागची दोन वर्षे साधेपणाने साजरे करावे लागले होते. शेकडो वर्षांपासून अखंडपणे सुरू असलेल्या आषाढी पायी वारीमध्येही यामुळे खंड पडला. तथापि, कोरोनाचे मळभ दूर झाल्यानंतर यंदा आषाढी वारीचा सोहळा भक्तिभावात व लाखो भाविकांच्या साक्षीने पार पडला. त्यानंतर गणेशोत्सव, नवरात्रोत्सवातही हाच हर्षोल्हास पहायला मिळाला. देशभर आज विजयादशमी अर्थात दसरोत्सव साजरा होत असून, यंदाचा उत्साह निश्चितपणे वेगळा असेल. विजयादशमीबद्दल अनेक आख्यायिका आहेत. दुर्गा देवीने नऊ दिवसांच्या घनघोर युद्धानंतर महिषासुराचा वध करून विजय मिळविला, म्हणून या दिवसाला विजयादशमी म्हणतात. तर प्रभू रामचंद्रांनीही याच दिवशी रावणाचा वध केला, अशीही आख्यायिका आहे. दसऱयाच्या दिवशी गावची सीमा ओलांडण्याची प्रथा प्रचलित असून, शमीच्या वा आपटय़ाच्या झाडाचे पूजनही करतात. हृदयाच्या आकारासम असलेली आपटय़ाची पाने परस्परांना देऊन स्नेह वृद्धिंगत केला जातो. आज काळ बदलत असून, सणांना इव्हेंटचे स्वरूप आल्याचे पहायला मिळते. किंबहुना, त्यामागचा मूळ भावार्थ काय आहे, हे आपण जाणून घ्यायला हवे. संत महंत, विचारवंत, तत्त्वज्ञांनी आपल्या आचारविचारांतून समाज जोडण्याचा संदेश दिला. आपटय़ाचे इवलेशे पानही ‘माणसे जोडा’, हेच सांगते. दुर्देवाने आज महाराष्ट्रातील, देशातील चित्र याच्या विपरित असल्याचे दिसून येते. उजव्या, डाव्या विचारांच्या संघटना, त्यांचे तथाकथित नेते विचारांचे विष पेरताना दिसतात. या गोष्टींपासून सर्वच घटकांतील समाजाने दूर राहणे आवश्यक होय. एकेकाळी राजकारणालाही एक दर्जा होता. वैचारिक मतभेद असले, तरी त्यात सूडबुद्धी वा द्वेषभावना नसे. म्हणूनच राजकारणाच्या या घसरलेल्या स्तराविषयी यानिमित्ताने चर्चा व्हायला हवी. महाराष्ट्रासारख्या राज्याने देशाला विचार दिला. संस्कार दिला. परंतु, आज येथे पहायला मिळणारे राजकारण कोणत्याही विवेकी माणसाकरिता वेदनादायीच ठरते. मागच्या काही दिवसांपासून दसरा मेळाव्यावरून येथील राजकारण तापले आहे. न्यायालयाच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची शिवतीर्थावर दसरा मेळावा घेण्याची परंपरा अबाधित राहणार आहे. तर शिंदे गट बीकेसी मैदानावर मेळावा घेईल. या माध्यमातून शक्तिप्रदर्शन करण्याकरिता ठाकरे व शिंदे यांनी ताकद लावली आहे. याकरिता शिंदे गटाने एसटी बसेससह मोठय़ा प्रमाणात खासगी बसेस बुक केल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे शासकीय यंत्रणेचाही यासाठी वापर होत असेल, तर ती काही चांगली गोष्ट म्हणता येत नाही. सत्तांतर झाल्यापासून शिवसेना व शिंदेसेनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. दसरा मेळाव्यात हा स्वर टीपेला न पोहोचला, तर नवल. पक्षापक्षात संघर्ष असणे स्वाभाविकच होय. मात्र, तो इतका टोकाला जात असेल, तर त्यातून राज्याचे हित कसे साधणार, हा प्रश्न उपस्थित होतो. याबाबत राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांनी ठाकरे व शिंदे यांना मर्यादांचे उल्लंघन न करण्याचा दिलेला सल्ला हा संबंधितांनी मनावर घ्यायला हरकत नाही. विशेषतः राज्याचे प्रमुख म्हणून एकनाथ शिंदे यांनी अधिक जबाबदारीने वागायला हवे. बंडखोरी का केली, याचा खुलासा आणि मातोश्रीचे हिंदुत्व कसे खोटे आहे, एवढे एकच पालुपद ते किती दिवस लावत राहणार? सत्तांतर होऊन आता बरेच दिवस लोटले आहेत. आपले बंडखोर सहकारी व भाजपाला सोबत घेत राज्याला पुढे नेण्यावर खरे तर त्यांनी लक्ष केंद्रित करायला हवे. वेदांता-फॉक्सकॉनसारखा महत्त्वाचा प्रकल्प गमावल्यानंतर नवे उद्योग आणण्यासाठी त्यांनी प्रयत्नशील राहायला पाहिजे. जेणेकरून राज्यात मोठय़ा प्रमाणात रोजगारनिर्मिती होऊ शकेल. याशिवाय आपल्या गटातील रामदास कदम, संदिपान भुमरे, अब्दुल सत्तार, शंभूराजे देसाई, गुलाबराव पाटील अशा बोलघेवडय़ा नेत्यांनाही त्यांनी सबुरीचा सल्ला द्यायला हवा. दसरा मेळाव्याला कुणाच्या मतदारसंघातून बसने अधिकाधिक माणसे पोहोचविली जातील, कोण किती गर्दी जमवेल, या गोष्टी फिजूल आहेत. लोक मनाने कुणासोबत असतील, हा महत्त्वाचा मुद्दा असेल. त्या दृष्टीने अंधेरी पूर्वची निवडणूक ही लिटमस टेस्ट ठरावी. शिवसेनेचे नेते रमेश लटके यांच्या निधनामुळे येत्या 3 नोव्हेंबरला ही निवडणूक होईल. शिवसेनेकडून लटके यांच्या पत्नी ऋतुजा लटके यांची उमेदवारी निश्चित मानली जाते. शिंदे गटाकडे येथून उमेदवार नसल्याने भाजपाकडूनच ही निवडणूक लढविली जाईल, असे संकेत आहेत. मागील वेळी अपक्ष म्हणून लढलेल्या मुरजी पटेल यांना येथून उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे. 2014 मध्ये स्वतंत्र लढूनही सेनेने येथून भाजपावर विजय मिळविला होता. या खेपेला भाजपा व शिंदे गटाची ताकद एकत्र झाली, तरी त्याचा फारसा प्रभाव पडण्याची शक्यता वाटत नाही. या मतदारसंघात काँग्रेसचाही मोठा कोटा आहे. मागील निवडणुकीत त्यांना जवळपास 19 टक्के मते मिळाली होती. राष्ट्रवादीने सेनेला पाठिंबा दिला असून, काँग्रेसचेही पाठबळ मिळण्याची चिन्हे आहेत. शिंदेगटाने निवडणूक न लढविल्यास सेनेला धनुष्यबाण मिळू शकतो, असेही काही तज्ञ सांगतात. मात्र, चिन्ह मिळाले नाही, तरी सेनेला फार अडचण येईल, अशी स्थिती नाही. प्रस्ताव आला, तर बिनविरोधबाबत विचार करू, असे भाजपाने म्हटले आहे. त्यामुळे पुढे काय होते, ते पहावे लागेल. अर्थात अस्तित्वासाठी झगडणाऱया सेनेकरिता दसरा मेळावा व अंधेरी पूर्वची निवडणूक हा महत्त्वाचा टप्पा असेल. न्यायालयात निर्णय लागेल, तो लागेल. परंतु, जनतेच्या न्यायालयात पहिला कौल सेनेच्या बाजूने पडला, तर ती एकनाथ शिंदे व बंडखोरांसाठी मोठी चपराक ठरेल. त्यातून सेनेलाही संजीवनी मिळेल. त्यामुळे आव्वाज कुणाचा, सीमोल्लंघन कुणाचे, हे निकालाअंतीच कळेल.
Previous Articleअपहरणकर्ते, खूनी हल्ला प्रकरणी त्वरित छडा लावा
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.