पुढील फेरीसाठी 4800 जण पात्र : नोंदणीपैकी अर्ध्यानीच लावली हजेरी
प्रतिनिधी /पणजी
राज्य सरकारतर्फे अर्थात कामगार आयुक्तांमार्फत आयोजित करण्यात आलेल्या मेगा जॉब फेअरला भरघोस प्रतिसाद मिळाला. सुमारे 21000 जणांनी नोंदणी केली होती, त्यापैकी 10000 पेक्षा जास्त उमेदवारांनी हजेरी लावली. एकूण 500 उमेदवारांची अंतिम निवड होऊन त्यांना नोकरीचे पत्र देण्यात आले. उर्वरीत 4800 उमेदवारांना पुढील फेरीसाठी पात्र ठरविण्यात आले असून 1027 उमेदवारांचे अर्ज फेटाळण्यात आल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
कामगार आयुक्त राजू गावस यांनी दिलेल्या तपशीलानुसार उपरोक्त माहिती परिपूर्ण नाही. कारण रोजगार मेळावा दोन दिवस झाला असून त्याचा संपूर्ण अहवाल येणे बाकी आहे. सदर मेळाव्याला 150 पेक्षा जास्त कंपन्या सहभागी झाल्या, तर आयत्यावेळी काही कंपन्या, उद्योगांनी उपस्थितीती लावल्यामुळे नेमकी संख्या मिळालेली नाही. संपूर्ण माहिती गोळा करण्याचे काम अद्याप चालू असून वरील देण्यात आलेली संख्या कमी न होता वाढणार असल्याचा दावा गावस यांनी केला आहे.
उमेदवार खासगी नोकरीसाठी तयार
एवढय़ा भव्य प्रमाणात गोव्यात प्रथमच मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात आले होते. त्याला गोमंतकीय तरुण, तरुणींनी मोठय़ा प्रमाणात प्रतिसाद दिल्याने मेळावा एका दिवसाने वाढवून दोन दिवस करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. उमेदवारांनी सरकारी नोकरीच्या मागे न लागता खासगी नोकरीसाठी पुढे यावे, हा हेतू ठेवून सदर रोजगार मेळावा घेण्यात आला. यातून उमदेवार खासगी नोकरीसाठी तयार असल्याचे स्पष्ट झाले.
बेकारीची वस्तुस्थिती झाली उघड
मेळाव्यात ज्यांना पुढील फेरीसाठी पात्रता देण्यात आली आहे, त्यांना संबंधित कंपन्यांकडून पुन्हा बोलावणे येणार असून त्यांची निवड निश्चित असल्याची माहिनी सूत्रांनी दिली. या मेळाव्यातून 5000 नोकऱया देण्याचे उद्दष्ट सरकारने ठरव्नाले होते. परंतु त्यासाठी 21000 जणांनी नोंदणी केली. यावरून गोव्यातील बेकारीची वस्तुस्थिती समोर आली आहे. दक्षिण गोव्यातही अशा प्रकारे मेगा जॉब फेअर आयोजित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.