अध्याय एकोणीसावा
या अध्यायात आपण काय काय अभ्यासणार आहोत ते थोडक्मयात पहात आहोत. वेदशास्त्र शिकलेल्या मनुष्याकडे शास्त्रयुक्त पांडित्याचे ज्ञान असते. त्याच्या आधारे तो प्रपंच मिथ्या आहे इत्यादी सर्व सांगत असतो पण ते केवळ आनुमानिक व पुस्तकी ज्ञान होय. त्यात प्रत्यक्ष अनुभवाचा लेशही नसल्याने त्यात मुळीच तथ्य नसते. त्यामुळे त्याच्या सांगण्याने साधकाचे कधीच समाधान होत नाही. त्याला ती दिशाभूल वाटते पण तीच दिशाभूल नाहीशी होऊन अनुभवज्ञान प्राप्त झाले म्हणजे साधकाला परमानंदाचा लाभ होतो. तो जे वेदान्तश्रवण करितो, ते ते तो स्वतःच होत जातो.
असे होणे हेच आनुभविक ज्ञानाचे खरे व शुद्ध लक्षण होय. भगवंत या अध्यायात हे सर्व सविस्तर सांगणार आहेत. भगवंत सांगतात, असे अनुभविक ज्ञान प्राप्त होईपर्यंत श्रवण व मनन सोडू नये. श्रवण मननातून साधकावर संस्कार घडत जातात. परिक्षेच्यावेळी थोर ऋषीमुनी किंवा निरनिराळय़ा अवतारात भगवंत कसे वागले याचा सतत अभ्यास होत राहतो त्यातून आपोआपच आत्मानुसंधानाचा अभ्यास होत राहतो.
आत्मानुसंधान साधले की प्रपंचाचे भान मिथ्या भासू लागते. विषयांवर पाणी पडते आणि कल्पना विरून जाते. असे झाले की, त्याने घेतलेल्या शिक्षणाचा उपयोग संपलेला असतो. त्यामुळे त्याने त्याचा त्याग करावा. वेदशास्त्रार्थामध्ये जे निष्णात आहेत श्रवणमननाच्या अभ्यासाने युक्त आहेत अशांच्यापैकी ब्रह्मविद्या ज्यांना सुनिश्चितपणे प्राप्त झाली आहे त्यांच्या मनातला भवभ्रम दूर झालेला असतो. ज्याप्रमाणे दोराच्या अंगी असलेला सर्प न मारताच मेलेला असतो, त्याप्रमाणे हे घडते आणि त्याच्या मनात संसार खरा आहे हा समज आपोआपच नाहीसा होतो.
नाटकात राजाराणीच्या भूमिका करणारे नट नटी ज्याप्रमाणे नाटकापुरतेच राजाराणी असतात, त्याप्रमाणे या सृष्टीच्या निर्मितीसाठी आवश्यक असलेले प्रकृती पुरुष ही दोन्ही मिथ्याच उभारलेली आहेत हे त्याच्या लक्षात आलेले असते किंवा भिंतीवर नानाप्रकारची चित्रविचित्र चित्रे काढलेली असतात पण ती जशी खरोखर एक भिंतच असते त्याप्रमाणे सर्व चराचर त्याला एकरूपच दिसू लागते किंवा स्वप्नांतील अनेक प्रकारची कर्मे करत असला तरी त्यांचे जागृतीमध्ये कांहीच बंधन असत नाही, त्याप्रमाणे मी म्हणजे हा जीव व प्राण, मी हे अमुक कर्म करीत आहे हे सर्वच खोटे असे तो समजतो आणि त्यामुळे त्याला जे मिळतं त्याचंच नाव शुद्ध ‘आत्मप्राप्ती’ होय. उद्धवा ! त्यालाच खरोखर ‘निजानुभव’ असे म्हणतात, असे तू निश्चित लक्षात ठेव आत्मप्राप्ती झाल्याची आणखीही एक खूण आहे. ती अशी की, तेथे विषयोपभोगाशिवायच स्वानंद असतो. हे खरोखर अनुभवायचेच लक्षण आहे. अशा प्रकारचा अनुभव नसताना जे केवळ शाब्दीक ज्ञान असते, ते, खरोखर ‘आनुमानिक’ ज्ञान असे समज. ज्याच्या अनुभवात अनुमानाचा प्रवेश नाही, जो निरंतर स्वानंदाचा साक्षात्कार अनुभवत असतो, त्याने ज्ञानाचे साधन व वृत्तिरूप ज्ञान, दोन्ही टाकून द्यावे. ते त्याने टाकले नाही तरी त्याचा आपोआपच त्याग घडतो. ज्याप्रमाणे सूर्योदय झाला म्हणजे चंद्रासहवर्तमान नक्षत्रांचे तेजही नाहीसे होते. मारुती येताना पाहिला म्हणजे खरोखर नवचंडी (अहिरावणाची देवी) पळत सुटते. मग इतर भुतांची काय कथा ? त्यांची पुढे उभे राहण्याची सुद्धा छाती होत नाही. त्याप्रमाणे माझ्या साक्षात्काराने त्याला खरोखर बद्धताच राहात नाही. मग तिच्या निवृत्तीनंतर ज्ञान कसे राहणार? माझ्या अनुभवाच्या ठिकाणी बंध आणि मोक्ष दोन्ही मिथ्याच आहेत हे तू लक्षात ठेव. उद्धवा ! तेथे साधनज्ञानाचा काहीएक उपयोग नाही.
परमात्मस्वरूपामध्ये बंध आणि मोक्ष हे मायिकच आहेत. म्हणून तेथे ज्ञान किंवा ध्यान यांचा त्याग केला नाही तरी त्याग होतोच पण ज्ञानाचा व ध्यानाचा त्याग झाल्यानंतरही ज्ञान्याला माझी अतिशय आवड असते. ज्ञानी पुरूषाचे ध्येय, फळ, त्याच्या प्राप्तीचे साधन, स्वर्ग आणि मोक्षसुद्धा मीच आहे.
क्रमशः