बॉम्बे रेस्टॉरंट येथे अर्धा तास वाहतूक रोखली
प्रतिनिधी/ सातारा
सरकार कोणतेही असू द्या. प्रत्येक सरकारचा वचननामा हा शेतकऱयांना वीज बिल माफ करण्याचा असतो. परंतु निवडून आल्यानंतर फसवणूक करतात. महावितरण कंपनीमध्ये काही लोकप्रतिनिधींनी ठेके घेतले आहेत. स्लीपिंग पार्टनर झालेले आहेत. त्यांनी हे प्रकार थांबवले नाहीत तर भविष्यात उद्रेक होईल. सरकारला गुडघे टेकायला लावू, अशी शपथच सुर्याच्या साक्षीने घेत आहोत, अशा इशाराच स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला आहे.
बॉम्बे रेस्टाँरंट येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने रस्ता रोको आंदोलन केले. या आंदोलनामध्ये आंदोलनकर्त्यांनी एकच गट्टी… राजू शेट्टी…, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विजय असो अशा घोषणा देत दणाणून सोडत ठिय्या मारला. या आंदोलनात अर्जुनराव साळुंखे, रमेश पिसाळ यांच्यासह कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
यावेळी राजू शेळके म्हणाले, गेली अनेक दिवस स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकऱयांच्या प्रश्नावर सातत्याने भांडत आहे. यापूर्वी महाविकास आघाडी शासन होतं त्यानंतर महायुती शासन आलं. सरकारची स्थिंततरे अनेक पाहिली. कोण कोणाबरोबर पळतय. कोणाबर कोण जातय. कोण कोणाच कसही लग्न ठरवून घ्यायला लागले आहे. शेतकऱयांच्या प्रश्नांकडे जाणीवपूर्वक सत्ताधारी विरोधक दुर्लक्ष करत आहेत. खरेतर ही विरोधकांची जबाबदारी नाही का पण ते कोर्ट कचेऱयातच अडकले आहेत. प्रत्येकाच्या जाहिरनाम्यात शेतकऱयांचे वीज बिल माफ करु असे असते. परत निवडून आल्यावर फसवणूक करतात. सरकार चारही पक्षाचे आले. पण शेतकऱयाचे लाईट बील माफ झाले नाही. जीवनावश्यक वस्तू पिकवणारा शेतकरी आहे. त्या शेतकऱयांची लाईट तोडली जात आहे. कारखान्यातील काही व्यक्ती टोळी आणण्यासाठी उचल घेऊन शेतकऱयांची फसवणूक करतात. कायद्याप्रमाणे सगळया साधन संपत्तीवर अधिकार आहे. आम्हाला रात्री 1 वाजता लाईट दिली जाते. महावितरण कंपनीतल्या ठेक्यामध्ये लोकप्रतिनिधी अदृश्य पार्टनर आहेत. महावितरणच्या अधिकाऱयांवर मोक्कासारखी कारवाई झाली पाहिजे. आताची बिले शेतकऱयांना परवडत नाहीत. महावितरणच्या अधिकाऱयांवर मोक्काप्रमाणे कारवाई करावी, भविष्यात उद्रेक होईल, सरकारला गुडघे टेकायला लावू अशी आता सुर्याच्या साक्षीने शपथ घेतो असे सांगत त्यांनी साखर आयुक्त काळा गॉगल लावून शेतकऱयांच्या बाजूने लेख लिहतात असे असले तरीही त्यांच्याकडून कारखानदारांवर कारवाई होत नाही. कारखानदार अन् साखर आयुक्त यांच्यामध्ये साठेलोटे आहे, असाही आरोप केला.
रुग्णवाहिकेला दिली जागा
बॉम्बे रेस्टॉरंट चौकात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने चक्काजाम आंदोलन केल्यामुळे अर्धा तास वाहतूक विस्कळित झाली. यावेळी सायरन वाजवत एक रुग्णवाहिका आली. त्यावेळी मात्र आंदोलनकर्त्यांनी उठून रुग्णवाहिकेला जागा मोकळी करून देत पुन्हा आंदोलन सुरू केले.
मोठा पोलीस बंदोबस्त
आंदोलन मोठय़ा स्वरुपाचे होणार अशी माहिती गोपनिय विभागाच्यावतीने पोलिसांना मिळाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस निरीक्षक भगवान निंबाळकर, पोलीस उपनिरीक्षक मोरे यांच्यासह वाहतूक शाखेचे अभिजित यादव यांच्यासह कर्मचारी व स्ट्राईकिंग फोर्स उपस्थित होती. अप्पर पोलीस अधीक्षक बापू बांगर यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेऊन बारावीच्या परीक्षा आहेत, आंदोलन वाढवू नका, अशी विनंती केली.