ऑनलाईन टीम/तरुण भारत
शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडामुळे राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. ४० पेक्षा जास्त आमदार शिवसेना सोडून शिंदेंच्या गोटात दाखल झाले आहेत. यामुळे महाविकास आघाडी सरकार धोक्यात आले आहे. एकनाथ शिंदेंसह सगळे बंडखोर आमदार सध्या आसामध्ये आहेत. महाराष्ट्रात सुरु असलेल्या या राजकीय घडामोडीत आता पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी उडी घेतली आहे. शिवसेनेच्या बंडखोर आमदारांना पश्चिम बंगालमध्ये पाठवा, आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करु, असं म्हणत ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी भाजपाला टोला लगावला आहे.
दरम्यान , शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाराष्ट्रचं राजकारण तापलं आहे. एकनाथ शिंदे बंडखोर आमदारांना घेऊन प्रथम सूरतला गेले होते. त्यांनतर ते आता आसाममधील गुवाहाटीमध्ये वास्तव्यास आहे. गुरुवारी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे बंडखोर आमदार थांबलेल्या हॉटेलबाहेर आंदोलन केले होते. महाराष्ट्रात राजकीय घमासान सुरु असताना आता ममता बॅनर्जी यांनी यात उडी घेत भाजपवर टीका केली आहे.
भाजपा असैंविधानिक मार्गाने महाविकास आघाडीचे सरकार पाडण्याच प्रयत्न करत असल्याचा आरोप ममता यांनी केला आहे. भाजप आता सत्तेचा दुरुपयोग करून इतर पक्ष फोडत आहे, कोणीतरी तुमचाही पक्ष एक दिवस फोडेल असा इशाराही ममता बॅनर्जी (West Bengal CM Mamata Banerjee) यांनी दिला आहे.
ममता बॅनर्जी म्हणाल्या की, आम्हाला उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) आणि सर्वांनाच न्याय मिळवून द्यायचा आहे. आज भाजपा सत्तेत आहे. तुम्ही मनी, मसल, माफियाची ताकद वापरत आहात. पण एक दिवस तुम्हालाही जावं लागेल. कोणीतरी तुमचा पक्षही फोडेल. हे चुकीचं आहे. मी या गोष्टीला पाठिंबा देत नाही. आसामऐवजी त्या बंडखोर आमदारांना बंगालला पाठवा. आम्ही त्यांचा चांगला पाहुणचार करू. महाराष्ट्रानंतर ते इतर सरकारांनाही धक्का देतील. आम्हाला लोकांसाठी, संविधानासाठी न्याय हवा आहे.