जयसिंगपूर : प्रतिनिधी
जयसिंगपूर येथे भारत छोडो आंदोलनाच्या वर्धापनदिननिमित्त राष्ट्रपती भवन दिल्ली यांच्याकडून जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदगोंडा देवगोंडा पाटील (वय 107) यांचा क्रांतीदिनानिमित्त सन्मान करण्यात आला आहे. राष्ट्रपती भवनाकडून आलेले शाल, श्रीफळ आणि प्रमाणपत्र प्रांताधिकारी डॉ. विकास खरात यांच्या हस्ते पाटील यांना देवून मंगळवार सन्मानित करण्यात आले.
यावेळी प्रांताधिकारी डॉ. विकास खरात म्हणाले, जेष्ठ स्वातंत्र्यसैनिक आदगोंडा पाटील यांनी 1930 साली मामलेदारची नोकरी सोडून दे. भ. रत्नाप्पाण्णांच्या चळवळीत जावून भारत छोडो आंदोलनात सहभाग घेतला. कोल्हापूर यासह अन्य ठिकाणी ब्रिटीशाच्या विरोधात आंदोलने केली. उदगांव येथील कोठडीत त्यांनी शिक्षाही भोगली. त्याचबरोबर गोवा स्वातंत्र्य संग्रामात अमुल्य योगदान दिले आहे. आज 107 वर्षे असतानाही त्यांनी भारत छोडो आंदोलनातील आठवणींना उजाळा देवून आम्हांला प्रेरणा दिली आहे. त्यामुळे स्वातंत्र्यसैनिक आदगोंडा पाटील यांचे देशाच्या सेवेत महत्वाचे योगदान असल्याचे त्यांनी सांगितले.
स्वागत, प्रास्ताविक अण्णासाहेब क्वाणे यांनी केले. दरम्यान, शिरोळ तहसिल कार्यालया मार्फत स्वातंत्र्य सैनिक आदगोंडा पाटील यांचा सन्मान तहसिलदार डॉ.अपर्णा मोरे-धुमाळ, नायब तहसिलदार योगेश जमदाडे यांच्या हस्ते करण्यात आला. त्याचबरोबर शिरोळ तालुक्याच्या वतीने आदित्य पाटील यड्रावकर यांनीही सन्मान केला. यावेळी मुख्याधिकारी तैमूर मुलाणी, प्रकाश झेले, डॉ.सुरेश पाटील, दादा पाटील चिंचवाडकर, अजित उपाध्ये, महावीर पाटील, तलाठी अमोल जाधव, सचिन चांदणे, विठ्ठल मोरे, मंदार आवळे, राजेंद्र नांद्रेकर, प्रविण इंगळे, राहूल बंडगर आदी उपस्थित होते.