नव्या शैक्षणिक धोरणाची अंमलबजावणी
प्रतिनिधी /बेळगाव
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार सहावी ते आठवी वर्गासाठी एका शैक्षणिक वर्षात दहा दिवस विनादप्तर असणार आहेत. याशिवाय सहावीपासून ‘सेवा दिवस’ आणि ‘अनुभव दिवस’ याचीही अंमलबजावणी होणार आहे. यासाठीचा अभ्यासक्रम तयार करण्याचे काम शिक्षण खात्याच्यावतीने सुरू आहे.
बॅगलेस दिवस म्हणजेच विनादप्तर दिवशी विद्यार्थ्यांना स्थानिक व्यावसायिक असलेले सुतार, माळी, कुंभार, कारागीर आदी बलुतेदारांकडे घेऊन जाऊन अनुभव दिले जाणार आहेत. ‘सेवा दिवस’ दिनी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. यामध्ये शाळेची स्वच्छता, शाळेचे उद्यान सुसज्ज करणे, शाळेचा परिसर सुशोभित करणे, स्थानिक परिसराची स्वच्छता करणे, स्थानिक परिसरातील गरजूंना मदत करणे, झोपडपट्टी भागातील मुलांना शिकवणे आदींचा समावेश आहे.
एक दिवस ‘अनुभव दिवस’ म्हणून पाळण्यात येणार आहे. यानुसार अनाथाश्रम, वृद्धाश्रम, अंध मुलांची शाळा, मूकबधीर शाळा याठिकाणी भेट देऊन तेथे समाजसेवक आणि सेवाभावी संस्थाकरिता असलेल्या सेवेचा अनुभव विद्यार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे. अनुभव दिवसांमध्ये कळसुत्री बाहुल्यांचा खेळ यासारख्या स्थानिक परंपरा आणि संस्कृतीची ओळख करून देणे, स्थानिक वारसास्थळांना भेटी, लोककला केंद्रांना भेटी हे उपक्रम देखील राबविता येणार आहेत. नव्या धोरणानुसार शाळा संकुल उभारण्यात येणार असून याकरिता नर्सरी, एलकेजी, युकेजी आणि अंगणवाडी केंदे एकत्र आणण्यात येणार आहेत.
ग्रामीण खेळांनाही प्रोत्साहन
नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार ग्रामीण भागातील पारंपरिक देशी क्रीडा प्रकारानांही वाव देण्यात येणार आहे. ग्रामीण भागात खेळल्या जाणाऱया विटी दांडू, लंगडी, कबड्डी, सुरपाटी, पोषम पा, गोटय़ा आदी विविध 75 भारतीय खेळांचा समावेश असणार आहे. हे खेळ शाळेमध्ये अभ्यासक्रमाचा भाग म्हणून शिकवले जाणार आहेत. बास्केटबॉल, बॅडमिंटन अशा खेळांसाठी मूलभूत सुविधा ग्रामीण भागात उपलब्ध असत नाहीत. त्यामुळे मुलांना खेळापासून वंचित ठेवल्यासारखे होते. सर्व स्तरातील मुलांना क्रीडा उपक्रमात भाग घेण्यास प्रोत्साहन देण्यासाठी हे धोरण राबविले जाणार आहे.