रत्नागिरी प्रतिनिधी
राजापुरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांच्या खूनाचा आरोप असलेल्या पंढरीनाथ आंबेरकर याचा जामीन अर्ज मंगळवारी सत्र न्यायालयाने फेटाळून लावला. खून प्रकरणात अटक झाल्यानंतर आंबेरकर याने जामीनासाठी अर्ज दाखल केला होता. मंगळवारी या जामीन अर्जावर सुनावणी झाल़ी. यावेळी दोन्ही बाजूचा युक्तीवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायायलयाने आंबेरकर याचा जामीन अर्ज फेटाळून लावल़ा.
रत्नागिरी अतिरिक्त सत्र न्यायाधीश एल़ डी बिले यांनी जामीन अर्जावरील निकाल दिल़ा. सरकारी पक्षाकडून ॲड. अनिरूद्ध फणसेकर यांनी युक्तीवाद केला. मुंबई-गोवा महामार्गावरील कोदवली पेट्रोल पंप समोरील रस्त्यावर 6 फेबुवारी 2023 रोजी राजापूरातील पत्रकार शशिकांत वारिशे यांचा थार गाडीखाली चिरडून मृत्यू झाला होता. घटनेच्या दिवशी पोलिसांकडून सदोष मनुष्यवधाचा गुन्हा संशयित आरोपी याच्याविरूद्ध दाखल केला होता. मात्र पोलिसांच्या तपासामध्ये हा पूर्वनियोजित खून असल्याचे तपासात समोर आले. त्यानुसार पेलिसांनी पंढरीनाथ आंबेरकर याला अटक केली होती.
पंढरीनाथ याच्याविरूद्ध भादंवि कलम 302 नुसार राजापूर पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघातामधील थार गाडी ही पंढरीनाथ आंबेरकर याचे नावावर असल्याचे दिसून येत आहे. ही गाडी आंबेरकर याने मे 2022 विकत घेतली होती. गाडीच्या मागे आरआरपीसीएल कंपनीचे नाव लिहलेले असून त्याखाली रिफायनरी समर्थक असे लिहलेले स्पष्टपणे दिसून येत आहे. शशिकांत वारिशे यांच्या खून प्रकरणातील आंबेरकर वापरत असलेली थार गाडी नेमकी कुणाच्या मालकीची असा प्रश्न उपस्थित करण्यात येत होता. मात्र उपपादेशिक परिवहन विभागाच्या माहितीनुसार थार गाडी पंढरीनाथ याचीच असल्याचे समोर आले आहे.
राजापूरातील पत्रकार शशिकांत वारिशे हे राजापूर तालुक्यातील बारसू येथील प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पा विरोधात लिखाण करत होते. तर पंढरीनाथ आंबेरकर हा स्वतला रिफायनरी समर्थक म्हणवून घेत होता. वारिशे हे करत असलेल्या लिखाणातूनच वारिशे यांचा काटा काढण्यात आला असा आरोप नातेवाईक व वारिशे यांचा मित्रपरिवार व रिफायनरी विरोधकांकडून करण्यात आला आहे.