ग्रा. पं. पीडीओंना शेतकऱयांचे निवेदन
वार्ताहर /कडोली
भाताचा साठा करण्यासाठी कडोली येथे शेतकऱयांसाठी एका मोठय़ा गोडावूनची उभारणी करावी, अशी मागणी करणारे निवेदन शेतकऱयांनी ग्राम पंचायतीला दिले.
कडोली परिसर हा भात उत्पादक प्रदेश म्हणून प्रसिद्ध असून या ठिकाणी मोठय़ा प्रमाणात इंद्रायणी भाताचे उत्पादन घेतले जाते. भात उत्पादन घेतल्यानंतर भाताचा साठा करण्यासाठी पुरेशी जागा नाही. त्यामुळे नाईलाजास्तव कवडीमोल दराने भाताची विक्री करावी लागते. याचा नेमका फायदा व्यापारीवर्ग उचलत असतो आणि शेतकरी मात्र नुकसानीत सापडतो.
तेव्हा भाताचा साठा करण्यासाठी मोठय़ा गोडावूनची आवश्यकता आहे. तेव्हा गोडावून बांधण्यासाठी ग्राम पंचायतीने 2 एकर जमीन मंजूर करावी, अशी मागणी करणारे निवेदन ग्राम पंचायतीचे पीडीओ वासुदेव ऐक्रत, ग्रा. पं. उपाध्यक्षा प्रेमा नरोटी यांना देण्यात आले. यावेळी कडोली गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.