पुणे / प्रतिनिधी :
राज्यभरात सुरु असलेला थंडीचा कडाका कायम असून, विदर्भ, मराठवाडा व मध्य महाराष्ट्रात अनेक जिल्हय़ांत किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दरम्यान, मंगळवारी जळगावात सर्वात कमी 9.2 अंश सेल्सिअस इतके तापमान नोंदविण्यात आले.
देशाच्या बहुतांश भागात थंडीचा जोर आहे. उत्तर भारतात काही राज्यांत मोठया प्रमाणात हिमवृष्टी होत आहे. त्यामुळे वायव्य, पूर्व भारतात थंडीचा जोर आहे. देशात मैदानी भागात पश्चिम राजस्थानातील चुरु येथे 6.4 अंश सेल्सिअस इतके किमान तापमान नोंदविण्यात आले. दुसरीकडे बंगालच्या उपसागरात आंध्र किनारपट्टी व तामिळनाडू दरम्यान असलेल्या कमी दाबाच्या क्षेत्राची तीव्रता येत्या 24 तासांत कमी होणार आहे. मात्र याच्या प्रभावामुळे या भागात मुसळधार पाऊस होणार असून, समुद्रही खवळलेला राहणार आहे. त्यामुळे मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक वाचा : पुण्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणाचे राजस्थान कनेक्शन उघड
राज्यात गारठा कायम
उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यात वाढ झाल्याने राज्यातील अनेक भागांत किमान तापमान घटले आहे. हवामान कोरडे असल्याने राज्यात गारठा अधिकच जाणवत आहे. दिवसा बोचरी थंड हवा, रात्री हुडहुडी भरवणारी थंडी असे काहीसे चित्र राज्यात आहे. रात्रीपासूनच सर्वत्र धुके पसरत आहे. विदर्भ, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्रातील अनेक भागातील किमान तापमानाचा पारा घसरला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांत नोंदविण्यात आलेले किमान तापमान पुढीलप्रमाणे अंश सेल्सिअसमध्ये
कुलाबा 21.4, सांताक्रूझ 17, रत्नागिरी 19.1, डहाणू 16.5, पुणे 11.2, लोहगाव 13.9, कोल्हापूर 19.1, महाबळेश्वर 12.1, नाशिक 9.5, सांगली 18.1, सातारा 15.5, सोलापूर 18.8, उस्मानाबाद 9.9, औरंगाबाद 10, परभणी 14.2, नांदेड 16, अकोला 13.1, अमरावती 11.7, बुलढाणा 12.5, ब्रह्मपुरी 14. 1, चंद्रपूर 14.8, गोंदिया 11.2, नागपूर 13, वाशिम 13, वर्धा 12.8, पणजी 21.