सांडपाणी मलप्रभा नदीमध्ये मिसळत असल्याने खानापूर ते वड्डेबैलपर्यंत संपूर्ण पाणी प्रदूषित
प्रतिनिधी /खानापूर
खानापूर शहराचे सांडपाणी मोठय़ा प्रमाणात मलप्रभा नदीमध्ये मिसळत असल्याने खानापूर ते वड्डेबैलपर्यंत मलप्रभा नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे. या पाण्याला जनावरेही तोंड लावायला तयार नाहीत. यामुळे खानापूरसह कुप्पटगिरी, करंबळ, जळगा, यडोगा, बलोगा, चापगाव, वड्डेबैल परिसरात माणसांबरोबरच जनावरांच्या आरोग्यालाही धोका निर्माण झाला आहे. मलप्रभेत मिसळणारे सांडपाणी जोपर्यंत बंद होत नाही तोपर्यंत मलप्रभा नदी अधिकच प्रदूषित होणार आहे.
खानापूर शहरातील सर्व सांडपाणी थेट मलप्रभा नदीत जावून मिसळत आहे. जागोजागी बंधारे बांधून मलप्रभेचे पाणी अडविण्यात आले आहे. पण सांडपाण्याचा अंश वाहत्या पाण्याबरोबरच वड्डेबैल बंधाऱयापर्यंत पोहोचल्याने सारे पाणीच दूषित बनले आहे. जोपर्यंत मलप्रभा नदीत सांडपाणी जाणे बंद होत नाही किंवा त्यासाठी मंजूर झालेली भुयार गटार योजना मार्गी लागत नाही तोपर्यंत मलप्रभा नदीतील पाणी दूषितच राहणार आहे. खानापूर शहरात असलेला कत्तलखाना, मटण मार्केट तसेच चिकन सेंटरर्समधील घाण वस्तू तसेच रस्त्याचे पाणीदेखील गटारीतसोडले जाते.
मटण, चिकनचा काही भागही अवैज्ञानिक पद्धतीने निचरा केला जातो. त्यामुळे ती घाण गटारींतून थेट नदीपात्रातच पोहोचते. यावर्षी शहरात वरचेवर मोठे पाऊस झाले. यामुळे गटारीतून ती संपूर्ण घाण मलप्रभा नदीच्या नवीन पूलवजा बंधाऱयात येऊन अडकली आहे. त्या ठिकाणी तातडीने ती घाण बाजूला काढणे गरजेचे आहे.
प्रदूषणाचा प्रश्न अधिकच बिकट
मलप्रभेत मिसळणाऱया सांडपाण्यासंदर्भात वेळीच गांभीर्याने विचार करावा लागणार आहे. ते सांडपाणी मलप्रभा नदीत न सोडता ते एका ठिकाणी साठवून त्याच्यावर प्रक्रिया करण्यासाठी भुयारी गटार योजनेचा आराखडाही तयार करण्यात आलेला आहे. पण वेगवेगळय़ा कारणांमुळे त्याचे कामही रखडल्याने दिवसेंदिवस मलप्रभा नदी प्रदूषणाचा प्रश्न अधिकच बिकट बनत चालला आहे.
जनतेतून तीव्र संताप
यासंदर्भात खानापूर नगरपंचायत तसेच जिल्हा प्रशासनाने तातडीने याची दखल घेऊन मलप्रभा नदी प्रदूषणमुक्त करावी, अशी मागणी वरील सर्व गावांतील जनतेतून होत आहे. यासंदर्भात त्या सर्व गावांमधील जनतेत तीव्र संताप उफाळला असून हा प्रश्न प्रशासनाने गांभीर्याने न घेतल्यास खानापूरच्या सांडपाण्यापासून मलप्रभा नदीला मुक्ती मिळावी, यासाठी या सर्व गावांतील जनता आंदोलनाच्या पवित्र्यात आहे.